Zilla Parishad Election : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठीचा निवडणूक प्रचार गुरुवारी संपला. यानंतर उद्या, शनिवार, 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे आणि सोमवार, 9 फेब्रुवारी रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. राज्यातील 12 जिल्हा परिषदांमध्ये 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर यांचा समावेश आहे.
सोमवारी होणार मतमोजणी :
या जिल्हा परिषदांतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांसाठीही त्याच दिवशी मतदान होणार आहे. निवडणूक प्रचाराचा कालावधी गुरुवारी रात्री 10 वाजता संपला. 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान होईल. तर 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरु होईल. या निवडणुका मूळतः 5 जानेवारी रोजी होणार होत्या आणि 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार होती. मात्र, 28 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात निधन झाल्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या राज्य शोकामुळं, राज्य निवडणूक आयोगानं निवडणूक आणि मतमोजणीच्या तारखा दोन दिवसांनी पुढं ढकलल्या. अजित पवार यांचं बारामती इथं प्रचाराला जाताना विमान अपघतात दुःखद निधन झालं.
निवडणुकीवर शोककळा पसरली :
अजित पवारांच्या अकाली निधनामुळं निवडणूक निकालांवर शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस (SP) प्रमुख शरद पवार, शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी प्रचारापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (SP) आमदार रोहित पवार यांनी मतदारांना दिवंगत अजित पवार यांचे स्मरण करण्याचं आणि त्यांच्या विचारांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषदेच्या निवडणुका घड्याळाच्या चिन्हाखाली एकत्रितपणे लढवत आहेत. अजित यांच्या आजोबांच्या निधनामुळं, कुटुंबातील कोणत्याही सदस्यानं निवडणूक प्रचारात भाग घेतला नाही.












