Zilla Parishad : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आज सर्वात मोठा दिवस आहे. ‘मिनी-विधानसभा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यातील 12 जिल्ह्यांमधील जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीसाठी मतदान सुरु झालं आहे. या निवडणुका केवळ ग्रामीण विकासाची दिशा ठरवणार नाहीत तर राज्यातील मुख्य राजकीय आघाड्यांसाठी (महायुती आणि महाविकास आघाडी) एक अग्निपरीक्षा ठरतील. महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अधीनस्थ 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका शनिवार, 7 फेब्रुवारी रोजी होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगानं या निवडणुकीसाठी विस्तृत तयारी केली आहे.
7438 उमेदवार मैदानात :
आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 731 जिल्हा परिषद जागा आणि 1462 पंचायत समिती जागांसाठी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. एकूण 7438 उमेदवार रिंगणात आहेत, तर एकूण मतदारांची संख्या 2,08,20,702 आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे.
- 731 जागा – जिल्हा परिषद
- 1462 जागा – पंचायत समिती
- 7438 – उमेदवार
या 12 जिल्ह्यांमधील निवडणुका :
राज्य निवडणूक आयोगानं 13 जानेवारी 2026 रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर जिल्हा परिषदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. सुरुवातीला मतदान 5 फेब्रुवारी रोजी होणार होतं, परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातात निधन झाल्यानंतर राज्यात तीन दिवसांचा शोक जाहीर करण्यात आल्यामुळं ही तारीख बदलण्यात आली.
मतदानाची वेळ :
शनिवारी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान होईल. शांततेत निवडणूक पार पडावी यासाठी प्रशासनानं कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. 9 फेब्रुवारी (सोमवार) सकाळी 10:00 वाजता मतमोजणी सुरु होईल, त्यानंतर ग्रामीण महाराष्ट्राचा प्रभारी कोण असेल हे स्पष्ट होईल.












