Indapur Land Transfer to MIDC : इंदापूर तालुक्याच्या औद्योगिक नशिबाला आता नवी झळाळी मिळणार असून, या भागातील हजारो तरुणांच्या हाताला काम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या रत्नपुरी मळ्यातील तब्बल एक हजार एकर जमीन ‘एमआयडीसी’कडे हस्तांतरित करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतरच्या पहिल्याच बैठकीत हा निर्णय झाल्याने इंदापूरमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
हेही वाचा – बीडमध्ये पोलिस भरतीच्या मैदानी चाचणी दरम्यान उमेदवाराचा मृत्यू
इंदापूर तालुक्यात एक अद्ययावत औद्योगिक वसाहत असावी, असे स्वप्न दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहिले होते. त्यांच्या या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी आमदार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या जमिनीच्या हस्तांतरणामुळे आता इंदापूरमध्ये मोठ्या कंपन्यांचा शिरकाव होणार असून, बारामती आणि पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक पट्ट्याला अधिक विस्तार मिळणार आहे.
एमआयडीसीमुळे स्थानिक उद्योजकांना नवनवीन संधी
या निर्णयामुळे इंदापूर आता केवळ शेतीप्रधान तालुका न राहता ‘इंडस्ट्रियल हब’ म्हणून नावारूपाला येण्याची शक्यता आहे. या एमआयडीसीमुळे स्थानिक उद्योजकांना नवनवीन संधी मिळतीलच, शिवाय ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळेल. औद्योगिक विकासाच्या दिशेने हा निर्णय म्हणजे इंदापूरसाठी एक ‘टर्निंग पॉईंट’ ठरेल, असा विश्वास राजकीय आणि औद्योगिक वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.












