Malegaon terrorist hideout : मालेगाव अतिरेकी व बोगस जन्मदाखल्याचे केंद्र बनले असून बांगलादेशी अड्डा झाला असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. सोमय्यांच्या मालेगाव दौऱ्याच्या निमित्ताने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिकेचे महापौर, उपमहापौर तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांनी सोमय्यांना जोरदार विरोध केला.
हेही वाचा – जपानी मुलीचा व्हिडीओ शेअर करत मनसे प्रमुख राज ठाकरेंचे RSS वर डागली तोफ..
सोमय्या यांच्या पाठपुराव्यामुळे मालेगावात बनावट जन्म दाखला घोटाळा प्रकरण उघडकीस आला होता. याप्रकरणी 1044 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले तर 100 पेक्षा जास्त लोक जेलची हवा खात आहेत. महापालिकेत निवडणुकीत हा मुद्दा केंद्रस्थानी होता. याच जन्म दाखला घोटाळा प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी किरीट सोमय्या आज मालेगाव दौऱ्यावर आले होते. यावेळी मालेगाव बांगलादेशी रोहिंग्यांचा अड्डा बनले आहे. अतिरेकी व बोगस जन्मदाखला प्रकरणाचे केंद्र बनल्याचा आरोप केला. तसेच अपर जिल्हाधिकारी व अपर पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन यासंबंधी माहिती घेतली.
तिरंगा ध्वज घेऊन सोमय्या यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी
दरम्यान, सोमय्या यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने मालेगावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मालेगाव महापालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका नसरीन शेख, उपमहापौर शान ए हिंद निहाल अहमद यांच्यासह नगरसेवक व नगरसेविका यांनी महापालिकेच्या पायऱ्यांवर हातात तिरंगा ध्वज घेऊन सोमय्या यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर सामन्यांच्या भेटीसाठी निघालेल्या आयुक्तांच्या गाडीला आडवे होत जाण्यास मज्जाव केला. मालेगावात एसआयटी तपासात एकही रोहिंग्या / बांगलादेशी आढळून न आला नाही. सोमय्या राजकारणासाठी सामाजिक तेढ निर्माण करीत असल्याचा आरोप यावेळी महापौर व उपमापौरांनी केला.
भाजप पक्षाचे केंद्र व राज्यात भाजपचे सरकार आहे
किरीट सोमय्या यांनी मालेगाव बांगलादेशी रोहिंग्यांचा अड्डा बनल्याचा केलेल्या आरोपाचे मालेगावातून तीव्र पडसाद उमटले असून सोमय्या यांच्या या विधानाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. मालेगाव जर रोहिंग्या /बांगलादेशींचा अड्डा आहे तर सोमय्या ज्या पक्षाचे भाजपचे नेतृत्व करतात त्याच पक्षाचे केंद्र व राज्यात भाजपचे सरकार आहे. त्याचे गृहमंत्री काय करताहेत असा प्रतिसवाल यावेळी व्यक्त करण्यात आला.
सोमय्या यांनी शासकीय यंत्रणेचा वापर केला?
एकंदरीत जन्म दाखला घोटाळ्यावरून मालेगावात सुरू झालेला हा वाद आहे. यात अनेकांना जेलची हवा खावी लागली. मालेगावात हा पूर्वी प्रशासक राज असल्याने सत्ताधारी पक्षात असलेल्या सोमय्या यांनी शासकीय यंत्रणेचा चांगलाच वापर केला. मात्र, आता मालेगाव महापालिकेत आता इस्लाम पार्टीची सत्ता आल्याने या मुद्द्यावर सोमय्या आणि महापालिकेतील सत्ताधारी हा वाद पुढच्या काळात अधिक तीव्र होणार यात शंका नाही.












