Devendra Fadnavis | सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Vidhansabha Assembly Session) सुरू आहे. या अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच चढाओढ होताना दिसत आहे. शेतकरी कर्जमाफी, अवकाळी पाऊस अशा अनेक मुद्यांना हात घालत विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी देखील विरोधकांच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास करत त्यांना तोडीस तोड अशी उत्तरं देताना दिसत आहेत.
हेही वाचा – अजित पवारांच्या विमान अपघातामागे कुणाचा हात? रोहित पवारांनी थेट नावच सांगितलं, कोण आहे ती व्यक्ती?
आज (26 फेब्रुवारी) सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरही भाष्य केलं. यावेळी त्यांनी कर्जमाफी कधी करणार आणि कर्जमाफीसाठी आम्ही काय करत आहोत याबाबतची सविस्तर माहिती दिली.
शंभर टक्के अॅग्री स्टॅक तयार करणार
कर्जमाफीवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात जे आश्वासन दिले आहे ते आम्ही योग्य वेळी पूर्ण करणार आहोत. यासाठी आम्ही एक समिती तयार केली आहे. मागच्या अनेक कर्जमाफींमध्ये आम्हाला अनेक गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. बँका खात्यांची माहिती चुकीच्या पद्धतीने देतात. जुने बँक खाते काढत सरकारकडून पैसे घेतात. त्यामुळे ही होणारी फसवणूक रोखण्यासाठी आम्ही शंभर टक्के अॅग्री स्टॅक तयार करत आहोत.
शेतीचा डिजिटल रेकॉर्ड तयार करणार
आम्ही शेतीचा डिजिटल रेकॉर्ड तयार करत आहोत. या रेकॉर्डमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीची नोंदणी, शेतकऱ्यांची नोंदणी, सातबाराचा अहवाल या सगळ्याची यामध्ये नोंद असेल. तसेच आधार क्रमांक, डिजिटल रेकॉर्ड या सर्व गोष्टी तपासून कर्जमाफीचा विचार केला जात आहे, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.












