Manoj Jarange Patil | आज भाजप (BJP) नेते आणि आमदार प्रसाद लाड (MLA Prasad Lad) यांनी अंतरावली सराटी (Antarwali Sarati) येथे जाऊन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान मनोज जरांगे पाटलांनी प्रसाद लाड यांच्यासोबत मराठा समाजाच्या मागण्या, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती प्रश्न आणि आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज यावर चर्चा केली आहे. यावेळी जरांगेंनी खुल चॅलेंज देत राज्य सरकारवरही निशाणा साधला. ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा – “आत घुसून मारू…”, जरांगेंना भेटण्याआधी प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ
मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?
प्रसाद लाड यांच्यासोबत चर्चा करताना मनोज जरांगे म्हणाले की, गेल्या आठ महिन्यांमध्ये मी विखे पाटलांना अनेकदा फोन करून त्यांच्या कानावर मराठा विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा मुद्दा घातला आहे. सध्या राज्यातील 80 हजार मराठा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थांबली असून यामुळे मराठा मुलांचे सिबील स्कोअर खराब झाले आहेत. महामंडळाच्या विषयामध्ये परतावे मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे तब्बल 600 कोटी रूपये थकले आहेत. मी ही माहिती खोटी माहिती देत नाहीये तर पुराव्यांसहीत देत आहे, असं जरांगे म्हणाले.
आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जवर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, तुमची आई ती आमची आई. मात्र, जेव्हा आमच्या आईला मारलं जातं तेव्हा आम्ही त्यांच्याबद्दल का बोलू नये. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला पोलीसाने उचललंही नाही. त्या आईला पाणी तरी पाजायचं होतं. छातीवर पाय देऊन बंदुकीच्या दस्तेने पोलिसांनी मारलं. जर तुमचं नाक, कान तुटलं तर तुम्ही सहन करून दाखवा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, पोलीस माझे आहेत, पोलिसांना मारलं. पण पोलीस जर तुमचे आहेत मग जनता तुमची नाही का? आमच्यावर अन्यान का केला जातो? असा थेट सवाल जरांगेंनी उपस्थित केला.
पुढे मनोज जरांगेंनी खुलं आव्हान देत सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, आम्ही मुख्यमंत्र्यांना काही वाईट बोललो का? आम्ही उपमुख्यमंत्र्यांना काही वाईट बोललो का? मग आम्हाला का मारहाण करायची. मी कधीही पैशाने किंवा पदाने फुटत नाही. मला कोणीही दाखवून द्यावं की मी एक रूपया घेतला. सरकारनेही सांगावं की याला एक रूपया दिला, 700 रूपयांचं काम दिलं, कोणीही सांगावं. मी उद्या सकाळी फाशी घेतो आणि नाही घेतली तर मी दोन बापचा औलाद, असं खुलं आव्हान जरांगेंनी दिलं आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.












