India vs England : गतविजेत्या भारतीय संघाने टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये आपले वर्चस्व सिद्ध करत दिमाखात सेमिफायनलमध्ये धडक मारलीय. कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर झालेल्या सुपर-८ मधील अत्यंत चुरशीच्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा ५ विकेट्सनं पराभव केला. या विजयामुळे भारतीय संघाने साखळी फेरीतील कठीण समीकरणे पार करत टॉप फोरमधील स्थान पक्के केले असून, आता भारताचा सामना गुरुवारी ५ मार्चला मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध होणार आहे. या हायव्होल्टेज सेमीफायनल कोण बाजी मारणार? अन् फायनलचे तिकीट बुक करणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा – संजू सॅमसनची तुफान खेळी, वेस्ट इंडिज लोळवली; भारताची सेमीफायनलमध्ये दमदार एन्ट्री
वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना हा भारतासाठी ‘करो वा मरो’ असाच होता. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने भारतीय गोलंदाजीचा समाचार घेत २० षटकांत १९५ धावांचे तगडे आव्हान उभे केले होते. मात्र, भारताच्या संजू सॅमसनने जबाबदारीने खेळत अवघ्या ५० चेंडूत ९७ धावांची वादळी खेळी साकारली आणि विजयात मोलाचा वाटा उचलला. सॅमसनचे शतक अवघ्या ३ धावांनी हुकले असले, तरी त्याच्या या खेळीने भारतीय चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी दिली. हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा यांनीही मोक्याच्या वेळी फलंदाजी करत ४ चेंडू राखून भारताला विजय मिळवून दिला.
मुंबई हे टीम इंडियासाठी घरचं मैदान
मुंबई हे कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी आणि टीम इंडियासाठी घरचं मैदान असल्याने टीम इंडियाला येथील वातावरणाचा फायदा मिळण्याची दाट शक्यता आहे. इंग्लंडचा संघ सध्या प्रचंड फॉर्ममध्ये असून ते ग्रुप-२ चे टेबल टॉपर राहिले आहेत. विशेष म्हणजे, मागील काही आयसीसी स्पर्धांमध्ये इंग्लंडने भारताला नॉकआउट सामन्यांमध्ये कठीण आव्हान दिले आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवण्यासाठी भारताला आपली सर्व ताकद पणाला लावावी लागणार आहे. भारताच्या फलंदाजीत सध्या अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव हे त्रिमूर्ती मजबूत कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे, तर गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांच्या खांद्यावर असेल.
इंग्लंडला फायदा मिळू शकतो
मुंबईत पावसाची शक्यता कमी असली, तरी हवामानाच्या बदलामुळे सामना रद्द झाल्यास काय होईल, याकडे सर्वांचे लक्ष आहे. आयसीसीच्या नियमानुसार, जर सेमिफायनलचा सामना पावसामुळे रद्द झाला, तर सुपर-८ च्या गुणतालिकेत वरच्या स्थानावर असलेला संघ थेट फायनलमध्ये पोहोचतो. या स्थितीत इंग्लंड गुणतालिकेत वर असल्याने त्यांना फायदा मिळू शकतो, त्यामुळे भारतीय संघ मैदानातच विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल.
वानखेडे स्टेडियम कायम लकी राहिलंय
या मैदानाचा इंतिहास भारतीय संघासाठी फार काही चांगला राहिला नाही, याआधी वनडे विश्वचषकात याच मैदानात टीम इंडियाचा दारूण पराभव झाला होता, तर त्यानंतरही टी-20 विश्वचषकाच्या साखळी सामन्यात आफिक्रेविरुद्धची हार याच मैदनात झाली होती, अहमदाबाद स्टेडियमच्या आठवणी जरी कठीण राहिल्या असल्या तरी, मुंबईतलं वानखेडे स्टेडियम मात्र कायम लकी राहिलं आहे, याच मैदानात भारतानं 2011 च्या विश्वचषकासह अनेक ऐतिहासिक विजय मिळवले आहेत, त्यामुळे यावेळी वानखेडेत टीम इंडियाला फायनलचं तिकीट मिळणार का? हे गुरूवारीच कळेल.










