Eknath Shinde | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. कारण एकनाथ शिंदे हे सोमवारी (16 मार्च) रात्री अचानकपणे दिल्ली (Delhi) दौऱ्यावर गेले आहेत. तर आज सकाळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली.यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा – जितेंद्र आव्हाडांकडून आधी शिवरायांचा अवमान? राड्यानंतर माफीनामा!
एकनाथ शिंदे हे अचानक दिल्लीला गेल्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर शिंदेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधान परिषद निवडणूकीत उद्धव ठाकरेंना मदत करण्याबाबत मोठं वक्तव्य केलं.
एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नेमकी काय चर्चा झाली?
एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत नेमकी काय चर्चा केली याबाबत माहिती दिली. आजच्या बैठकीमध्ये राज्यातील विविध विकास कामांच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली. तसेच सध्या अमेरिका, इराण, इस्त्रायल या देशांमध्ये युद्ध सुरू असून या युद्ध काळात सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने पंतप्रधान मोदींसोबत उभे राहणे आवश्यक आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये विरोधकांकडून राजकारण केले जात आहे. हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी केलेल्या प्रयत्नांमुळे युद्ध सुरू असलेल्या देशातून आपल्या भारतीय लोकांना मायदेशी आणण्यास यश मिळाले आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
उद्धव ठाकरेंना मदत करण्याबाबत काय म्हणाले एकनाथ शिंदे?
माध्यमांनी एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंना विधान परिषद निवडणुकीत मदत करणार का? असा सवाल विचारला. त्यावर एकनाथ शिंदेंनी सूचक वक्तव्य केले. जर उद्धव ठाकरेंनी तुम्हाला विधान परिषद निवडणुकीसाठी फोन केला तर मदत करणार का? असा प्रश्न पत्रकरांनी विचारला. त्यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “आत्ताच राज्यसभेची निवडणूक पार पडली आहे. त्यामुळे जेव्हा विधानपरिषदेची निवडणूक येईल तेव्हा बघू”, असं मिश्किलपणे एकनाश शिंदेंनी उत्तर दिलं. शिंदेंनी केलेल्या या सूचक वक्तव्यामुळे ते उद्धव ठाकरेंना मदत करणार की नाही? असा सवाल सध्या निर्माण झाला आहे.
राज्याच्या राज्यसभा निवडणुका या बिनविरोध पार पडल्या आहेत. यानंतर आता लवकरच विधान परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत. तर या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी विधान परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा निवडून यावे, अशी इच्छा ठाकरे गटाची आहे. अशातच आता ठाकरेंना मदत करण्याबाबत एकनाथ शिंदेंनी सूचक वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.












