IPL 2026 | सध्या सर्वांना आतुरता लागली आहे ती आयपीएलच्या (IPL) नवीन हंगामाची. येत्या 28 मार्चला आयपीएलचा पहिला सामना होणार आहे. त्यामुळे आयपीएल पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुत आहे. यावेळी आयपीएलमध्ये नवीन खेळाडूंसह नवीन कर्णधार पाहायला मिळणार आहेत. मात्र, आत्तापर्यंतच्या आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधारपद कोणी भूषवले आहे याबाबत तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. मग यामध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma), महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांचा विक्रम काय आहे? आणि कोण पहिल्या नंबरवर आहे याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
हेही वाचा – पुण्यात पेट्रोल दरवाढीचा भडका; इराण-इस्रायल युद्धाचा थेट परिणाम, नागरिक त्रस्त
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने कर्णधार म्हणून कोणी खेळले?
आयपीएलच्या इतिहासामध्ये सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषविण्याचा विक्रम एम.एस.धोनीच्या नावावर आहे. धोनीने आत्तापर्यंत 235 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. तर यातील 136 सामने त्याने जिंकले असून 97 सामने गमावले आहेत. विशेष म्हणजे 200 पेक्षा जास्त सामन्यांमध्ये संधाचे नेतृत्व करणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे. धोनीने चेन्नई सुपर किंग्स व्यतिरिक्त रायझिंग पुणे सुपरजायंट संघाचेही कर्णधारपद भूषवले आहे.
एम.एस.धोनीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे रोहित शर्मा. रोहित शर्माने आयपीएलमध्ये एकूण 158 संघांचे नेतृत्व केले आहे. यामध्ये रोहित शर्माने कर्णधार म्हणून 87 सामने जिंकले आहेत तर 67 सामने गमावले आहेत. रोहितने मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधारपद भूषवले आहे.
तिसऱ्या क्रमाकांवर येतो तो विराट कोहली. विराट कोहली हा आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून आरसीबी संघाकडून खेळला आहे. त्याने आत्तापर्यंत या संघाची साथ कधीही सोडलेली नाहीये. तर विराटने आयपीएलमध्ये 143 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. यामध्ये त्याने 66 सामने जिंकले असून 70 सामने गमावले आहेत.
दरम्यान, एम.एस.धोनी, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह आयपीएलच्या इतिहासात अनेक दिग्गज खेळाडूंनी कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व केले आहे. मात्र, सातत्यपूर्ण कामगिरी, दबावाच्या क्षणी घेतलेले अचूक निर्णय आणि संघाला मिळवून दिलेले यश यामुळे एम.एस.धोनीचे नाव आजही कर्णधारांच्या यादीत अव्वल मानले जाते. त्यांच्या शांत आणि संयमी नेतृत्वशैलीमुळे चेन्नई सुपर किंग्सने अनेकदा विजेतेपद पटकावत आयपीएलमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर दुसरीकडे रोहित शर्मानेही मुंबई इंडियन्सला यशाच्या शिखरावर पोहोचवत प्रभावी कर्णधार म्हणून स्वतःची छाप उमटवली, तर विराट कोहलीनेही प्रभावी नेतृत्व करत आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर संघाला नवी ऊर्जा दिली आहे. या तिन्ही खेळाडूंनी आयपीएलच्या इतिहासात कर्णधारपदाची व्याख्याच बदलून टाकली आहे. दरम्यान, यंदाच्या आगामी हंगामांमध्ये नवे विक्रम नोंदवले जातील का आणि या दिग्गजांच्या कामगिरीला कोणी मागे टाकेल का, याची उत्सुकता आता क्रिकेटप्रेमींना लागून राहिली आहे.












