Farmer wheat crop fire Akola : अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील (Murtizapur Farmers) बिडगाव या गावातील एक साधा शेतकरी आणि त्याच्या आयुष्यभराच्या कष्टांची कहाणी. पण काही क्षणांतच या कष्टांची राख झाली (Wheat crop burnt to ashes) आणि उरला तो फक्त हतबलतेचा ढिगारा. प्रविण कुऱ्हाडे (Pravin Kurhade) असे या पिडित शेतकऱ्याचे नाव आहे.
चार एकर शेतात त्यांनी गव्हाच्या पेंड्या साठवून ठेवल्या होत्या. प्रत्येक पेंडीत त्यांचा घाम, कुटुंबाच्या आशा आणि उद्याच्या स्वप्नांचा साठा होता. पण अचानक उसळलेल्या भीषण आगीने सर्व काही क्षणार्धात भस्मसात केलं. ज्या पिकावर घर चालणार होतं, त्याच पिकाने आज त्यांना रडवून सोडलं.
पेंड्यांसोबत शेतकऱ्याचे स्वप्नही जळून राख
डोळ्यासमोर मेहनतीचं सोनं जळताना पाहणं, याहून मोठं दु:ख शेतकऱ्यासाठी काय असू शकतं? आगीत जळून खाक झालेल्या पेंड्यांसोबत कुऱ्हाडे कुटुंबाच्या आशाही जळून गेल्या.
विज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे शॉर्ट सर्किट
या आगीमागे विज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे झालेल्या शॉर्ट सर्किटचा आरोप केला जातोय. जर हे खरं असेल, तर हा केवळ अपघात नाही. तर एका शेतकऱ्याच्या आयुष्याशी खेळ झाल्याचं उदाहरण आहे.
पंचनाम्यात मात्र केवळ ९० हजारांची नोंद
लाखोंचं नुकसान झालं, पण प्रशासनाच्या पंचनाम्यात मात्र केवळ ९० हजारांची नोंद. ही तफावत जखमेवर मीठ चोळणारी ठरली. आधीच संकटात असलेल्या कुऱ्हाडे कुटुंबाला आता न्यायासाठीही लढावं लागतंय.
शेतकरी कर्ज, नैसर्गिक आपत्तीच्या विळख्यात
विदर्भात शेतकरी आधीच कर्ज, नैसर्गिक आपत्ती आणि ताणतणावाच्या विळख्यात अडकले आहेत. अशा घटना त्यांच्या मनावर आणखी खोल जखमा करतात. हा फक्त एक शेतकऱ्याचा प्रश्न नाही, तर संपूर्ण व्यवस्थेवर उभा राहिलेला मोठा प्रश्न आहे.
आता गरज आहे ती फक्त सहानुभूतीची नाही. तर ठोस मदतीची. कारण प्रत्येक जळालेल्या पेंड्यामागे एक कुटुंब उद्ध्वस्त होत असतं. आणि प्रत्येक अश्रूमागे एक वेदनादायक सत्य दडलेलं असतं.










