Kalpana Kharat | नाशिकचा (Nashik) भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी ढोंगी अशोक खरातला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. अशोक खरातने अनेक लोकांची आर्थिक फसवणूकही केली आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत खरातवर 10 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास विशेष तपास पथकाकडून केला जात आहे. या तपासात दररोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येताना दिसत आहे. अशातच आता खरात प्रकरणात आणखी एक नवीन बातमी समोर आली आहे.
अशोक खरात प्रकरणाचा तपास करण्यासाठी सध्या एसआयटी खरातच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी करत आहे. यासाठी एसआयटीचे अधिकारी खरातच्या नाशिक येथील बंगल्यावर मध्यरात्री गेले होते. खूप वेळ कोणी गेट न उघडल्यामुळे अधिकाऱ्यांनी शेजारच्या बंगल्यावरून उडी मारून खरातच्या बंगल्यात प्रवेश केला होता. त्यावेळी खरातची पत्नी कल्पना खरात (Kalpana Kharat) ही फरार असल्याचं अधिकाऱ्यांना आढळून आलं. तर अधिकाऱ्यांनी खरातचा मुलगा हर्षवर्धनला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. दोन दिवस हर्षवर्धनची चौकशी केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आलं होतं. नंतर पोलिसांना कसलीही माहिती न देता हर्षवर्धनही फरार झाला. त्यानंतर पोलीस खरातची पत्नी आणि लेकाचा शोध घेत आहेत. यादरम्यान आता खरातच्या पत्नीने मोठे पाऊल उचललं आहे.
खरातच्या पत्नीनं नेमकं काय उचललं मोठं पाऊल?
कल्पना खरातला तिचा पती अशोक खरातच्या कारनाम्यांची माहिती होती, त्यामुळे ती फरार झाली आहे. तसेत आता पोलिसांच्या चौकशीला सामोरे जाऊ लागू नये म्हणून आणि पोलिसांपासून आपल्याला संरक्षण मिळावे म्हणून कल्पना खरात ही गुप्त ठिकाणी पोहोचली आहे. तर पोलिसांनी शोध घेण्यास सुरूवात केली असल्याची कुणकुण लागताच कल्पना खरातने थेट न्यायालयात धाव घेतली आहे.
कल्पना खरातने नुकताच न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता कल्पना खरात पोलिसांसमोर सरेंडर करणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण कल्पनाने 4 एप्रिल रोजी अटकपूर्व जामीन दाखल केला आहे. तर या अर्जावर 10 एप्रिल रोजी पहिली सुनावणी पार पडणार आहे. जर कल्पना खरातला अटकपूर्व जामीन मिळाला तर खरात प्रकरणातील धागेदोरे शोधण्यास पोलिसांना मोठ्या अडचणी येऊ शकतात आणि जर कोर्टाने जामीन फेटाळला तर मात्र खरातच्या अडचणी चांगल्याच वाढणार आहेत. त्यामुळे आता येत्या या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.












