मुंबई RCB Beat MI : रविवार, 12 एप्रिल रोजी, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात डबलहेडरमधील दुसरा सामना खेळला गेला. सामन्यात मुंबईनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, आरसीबीनं एक मोठी धावसंख्या उभारली. आरसीबीसाठी विराट कोहली, फिलिप सॉल्ट आणि कर्णधार रजत पाटीदार यांनी अर्धशतकं झळकावली. या तिन्ही फलंदाजांनी आज उत्कृष्ट कामगिरी केली. परिणामी आरसीबीनं मुंबई इंडियन्सला 18 धावांनी पराभूत करुन गुणतालिकेत दोन गुण मिळवले.
हेही वाचा : MI vs RCB दोन्ही संघांतील खेळाडूंनी हातावर काळ्या पट्ट्या बांधून
आरसीबीच्या फलंदाजांची आक्रमक खेळी :
फलंदाजीची सुरुवात करताना, फिलिप सॉल्ट आणि विराट कोहली यांनी शतकी भागीदारी केली. दोघांनी मिळून 120 धावांची भागीदारी केली. सॉल्टनं 36 चेंडूंमध्ये 78 धावा करत एक दमदार खेळी केली. त्यानं सहा चौकार आणि सहा षटकार मारले, तर दुसरीकडे विराट कोहलीनं 38 चेंडूंमध्ये 50 धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या कर्णधार रजत पाटीदारनंही वादळी फलंदाजीचं प्रदर्शन केलं. त्यानं 20 चेंडूंमध्ये 53 धावा केल्या. पाटीदारनं सामन्यात 4 चौकार आणि 5 षटकार ठोकले. टीम डेव्हिडनंही 16 चेंडूंमध्ये 34 धावा केल्या, ज्यामुळं आरसीबीला 20 षटकांत 240/4 अशी धावसंख्या उभारण्यास मदत झाली.
मुंबईची फलंदाजी कशी :
241 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात सामान्य झाली. रायन रिकेल्टननं 22 चेंडूंमध्ये 37 धावा केल्या, तर रोहित शर्मा 13 चेंडूंमध्ये 19 धावा करुन निवृत्त झाला. तिलक वर्मा फार काही करू शकला नाही, 3 चेंडूंमध्ये 1 धाव करून तो बाद झाला. सूर्यकुमार यादवनंही 22 चेंडूंमध्ये 33 धावा केल्या, तर हार्दिक पांड्यानं 22 चेंडूंमध्ये 40 धावा केल्या. अखेरच्या षटकात रुदरफोर्डनं वादळी खेळी केली, मात्र त्याची खेळी संघाला विजय मिळवून देमअयासाठी पुरेशी ठरली नाही. परिणामी मुंबई इंडियन्स 20 षटकांत केवळ 222/5 धावाच करु शकली.












