Mumbai Corporate Love Jihad Case: नाशिकनंतर आता मुंबईतही ‘लव्ह जिहाद’ च्या नावाखाली गंभीर आरोप करण्यात येत असून या प्रकरणामुळे शहरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. चला तर जाणून घेऊयात याबाबत अधिक माहिती.
नाशिकनंतर आता मुंबईतही ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली गंभीर आरोप करण्यात येत असून, या प्रकरणामुळे शहरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. आग्रीपाडा परिसरात घडलेल्या या घटनेत १९ वर्षीय तरुणीचा काही महिन्यांपासून मानसिक आणि डिजिटल छळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, मुंबई येथील एका बांधकाम क्षेत्रातील कंपनीत टेलीकॉलर म्हणून काम करणाऱ्या तरुणीला तिच्या सहकाऱ्याने अश्लील मेसेज, फोटो आणि व्हिडीओ पाठवून त्रास दिला. आरोपीने तरुणीचा मोबाईल नंबर कंपनीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून मिळवल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये आहे.
तसेच आरोपीने तरुणीशी वारंवार व्हॉट्सअॅप कॉल करून तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्याने तिच्याकडे वैयक्तिक फोटो मागितले तसेच “लव्ह फ्रेंडशिप” (Love Friendship) करून लॉजवर भेटण्याची इच्छा व्यक्त केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
एफआयआरनुसार, आरोपीने इतर मुलींबाबतही आक्षेपार्ह दावे करत त्यांच्या फोटो आणि लैंगिक संबंधांविषयी वक्तव्ये केल्याचे समोर आले आहे. तसेच इतर तरुणींनाही अशाच प्रकारचे कॉल केल्याचा तपासात उलगडा झाल्याची माहिती आहे.
तरुणीच्या तक्रारीनंतर आग्रीपाडा पोलिसांनी संबंधित आरोपीविरोधात लैंगिक छळ, पाठलाग करणे आणि अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
दरम्यान, या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रिया उमटल्या असून, भाजपचे पदाधिकारी नितीन बनकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या किशोरी पेडणेकर यांनी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात जाऊन प्रकरणाची माहिती घेतली.
आरोपी हा एका स्थानिक लोकप्रतिनिधीच्या नातेवाईक असल्याचा आरोपही करण्यात येत आहे, मात्र याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. या प्रकरणामुळे सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून तपास पुढे सुरू आहे.












