SANJAY Raut : नाशिक येथे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित रिंग रोड प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भू-संपादन प्रक्रियेविरोधात शेतकऱ्यांचा संताप अधिक तीव्र होताना दिसत आहे. नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांनी प्रशासनावर बळजबरीने जमीन संपादन केल्याचा आरोप करत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. विशेषतः महिलांवर मारहाण झाल्याच्या आरोपामुळे हा वाद आणखी चिघळला आहे. याविरोधात आता स्थानिक शेतकरयांनी संजय राऊतांकडे मदतीची मागणी केली.
अधिकाऱ्यावर गंभीर आरोप
स्थानिक शेतकऱ्यांनी नाशिक येथील प्रांत अधिकारी पवन दत्ता यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सरकारी यंत्रणेचा दबाव टाकून शेतजमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी विरोध करणाऱ्या महिला शेतकऱ्यांशी गैरवर्तन करण्यात आले तसेच काही महिलांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता प्रशासनाने थेट कारवाई केल्याचा आरोपही शेतकरी संघटनांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून शेतकरी प्रशासनाविरोधात आक्रमक झाले आहेत.
शेतकऱ्यांकडून कारवाईची मागणी
या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून प्रांत अधिकारी पवन दत्ता यांना निलंबित करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच संपूर्ण भू-संपादन प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी आणि शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय कोणतीही कारवाई करू नये, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
संजय राऊतांचा प्रशासनाला इशारा
या प्रकरणात संतप्त शेतकऱ्यांनी खासदार संजय राऊत यांच्याकडे धाव घेत मदतीची मागणी केली. यानंतर संजय राऊत यांनी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत या प्रकाराची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. माध्यमांशी बोलताना त्यांनी हा विषय संसदेत उपस्थित करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले. तसेच प्रशासनाने अन्यायकारक कारवाई थांबवली नाही तर शेतकऱ्यांसोबत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.












