Abhishek Bachchan | सध्या अभिनेता रितेश देशमुखचा (Riteish Deshmukh) ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच सुपरहिट ठरला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन काही दिवसच झाले असून प्रेक्षकांकडून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. एकिकडे हा चित्रपट चांगलाच चर्चेत असताना दुसरीकडे या चित्रपटामुळे अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) देखील चर्चेत आला आहे.
हेही वाचा – “10 कोटी दे नाहीतर…”, एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी, कोण आहे धमकी देणारा मास्टरमाइंड?
अभिषेक बच्चनने या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ संभाजी शहाजी भोसले यांची भूमिका साकारली आहे. तर रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात जेनेलिया डिसूझा, विद्या बालन आणि सलमान खान यांच्याही मुख्य भूमिका आहेत. तर या चित्रपटाबद्दल सध्या एक चर्चा सुरू आहे. असं म्हटलं जात आहे की, अभिषेक बच्चनसह अनेक कलाकारांनी या चित्रपटासाठी कोणतेही मानधन घेतलेले नाही. तर आता या चर्चांवर स्वतः अभिषेक बच्चनने प्रतिक्रिया दिली आहे.
‘राजा शिवाजी’ चित्रपटाबाबत काय म्हणाला अभिषेक बच्चन?
एका वृत्तवाहिनीशी बोलताना अभिषेक बच्चनने ‘राजा शिवाजी’ चित्रपटावर भाष्य केलं. तो म्हणाला की, मी मराठी चित्रपटसृष्टीत यापूर्वी इतक्या मोठ्या स्केलवर बनलेला चित्रपट कधीही पाहिला नाही. युनिटला आनंदी, सुरक्षित आणि प्रेरित ठेवणे हे एक खूप कठीण काम होते. पण रितेश आणि जेनेलियाने या सर्व जबाबदाऱ्या खूप चांगल्या प्रकारे सांभाळल्या. सेटवर मला कोणाकडूनही कोणतीही तक्रार ऐकू आली नाही. मी त्यांना माझ्या कुटुंबापेक्षा वेगळे मानत नाही. ते खूप प्रेमळ, साधे आणि विश्वासू मित्र आहेत. मी मुंबईत वाढलो, त्यामुळे मला मराठी भाषा अवगत होती, पण पडद्यावर पहिल्यांदाच मराठी बोलत असल्यामुळे मी थोडा घाबरलो होतो, असं अभिषेकने सांगितलं.
रितेश देशमुखच्या चित्रपटात मोफत काम का केलं? काय म्हणाला अभिषेक बच्चन?
या संभाषणादरम्यान अभिषेक बच्चनने रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांचं कौतुक केलं. या स्टार जोडप्याचे कौतुक करताना तो म्हणाला की, आजकाल चित्रपटांमध्ये खूप गणिताचा वापर होतो, पण रितेश आणि जेनेलियाने हे सिद्ध केले आहे की प्रत्येक गोष्ट आकड्यांवर अवलंबून नसते. हा प्रोजेक्ट त्यांच्यासाठी पवित्र होता. त्यांनी या चित्रपटाला केवळ एक प्रोजेक्ट म्हणून कधीच पाहिले नाही, उलट एका चित्रपटापेक्षा खूप मोठी आणि अधिक पवित्र गोष्ट म्हणून पाहिले आहे, असं म्हणत अभिषेकने रितेश-जेनेलियाचं तोंडभरून कौतुक केलं.
पुढे त्याने या चित्रपटासाठी मानधन न घेतल्याच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, आजकाल रील्स म्हणजे फक्त आकडे आणि तथ्य असतात आणि लोकांना कलाकारांचे मानधन आणि व्हॅनच्या मागण्या यांसारख्या गोष्टींमध्ये रस वाटतो. पण शेवटी, हा एक कला प्रकार आहे. एक असा कला प्रकार जो हृदयातून सुरू होतो. जेव्हा तुमचा एखाद्या प्रोजेक्टवर मनापासून विश्वास असतो, तेव्हा पैसा आणि सुविधा महत्त्वाच्या ठरत नाहीत. माझ्यासाठी अभिनय म्हणजे भावनिक नातं आहे. प्रेरणा हीच कलेची खरी सुरुवात आहे, असं अभिषेक म्हणाला.












