Rohit Pawar on Pune Crime : पुणे आणि पिंपरी चिंचवड अवैध दारुमुळे हादरले आहे. विषारी दारुमुळे एकूण 16 जणांचा मृत्यू झाला आहे. यावरुन आमदार रोहित पवारांनी टीका करत सीपी सांगकाम्या असल्याची टीका केली आहे. वरुन सीपींना जे सांगितले जातं तेच सीपी करत राहतात. हा सीपी आल्यापासून पुण्यात रस्त्यावर कोयत्याने हल्ला केला जातो. दिवे घाटात 200-200 पोरं दारु पिऊन कोयते घेऊन, ड्रग्स घेऊन तमाशा करत असतील तर सीपी काय बोलतात यावर लक्ष देऊन आपण काय करणार, असा आरोप रोहित पवारांनी केलाय. त्यामुळे पुण्यातील सीपी आमितेश कुमार यांना कायदा व्यवस्था सांभाळण्यात खरंच अपयश आलं आहे का? रोहित पवार म्हणतात तसं सीपी खरंच सांगकाम्या सारखं काम करतात का? असा सवाल आता पुणेकरांना सतावत आहे.
पुण्यात सध्या अवैध दारुचा मोठा व्यवसाय सुरु असून दारु माफिया पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये बसले आहेत. हे दारु माफिया पोलिसांना हफ्ते देऊन आपला अवैध साम्राज्य सुरु ठेवत असल्याचा आरोप आहे. याच अवैध दारुमुळे तब्बल 16 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. मात्र, पुण्याचे सीपी अमितेश कुमार पुण्यात कोणतेही अवैध धंदे सुरु नसून पुण्यात कायदा सुव्यावस्था एकदम सुरळीत आहे, असे म्हणताना दिसतात. मात्र पुण्यात जमावबंदीचा कायदा लागू असून रात्री 10 वाजता दुकानं बंद होतात. तरीही रात्री दारु पिऊन अनेक जण आपला जीव गमावत आहे. यातच पुण्याचे पोलीस सांगिताना दिसतात की पुण्यात तर सर्व सुरळीत आहे.
रोहित पवारांनी आमितेश कुमारांना धरले धारेवर
याच मुद्द्यांवरून आमदार रोहित पवारांनी पुण्याचे सीपी आमितेश कुमार आणि राज्य सरकारला धारेवर धरले आहे. सीपी हे सांगकाम्या सारखं काम करतात. त्यांना वरुन जे सांगितलं जातं ते तेच करतात. ते पुण्यात आल्यापासून गुन्हेगारींच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे..त्यांनी गुंडाची धिंड काढली. पण आता तेच गुंड काळ्या गाडीतून फिरत रिल्स बवनतात आणि पोलिसांनाच हिनवताना दिसत आहेत. पुण्यात दिवसाढवळ्या कोयत्याने हल्ला होतो, अशी टीका रोहित पवारांनी केली.
तर कुटुंबाना आपल्या जवळची माणसं गमवावी लागली
पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत संशयित आरोपी वानखेडेसह एकूण 8 जणांना ताब्यात घेतले आहे. मात्र पोलिसांनी कुणालाही ताब्यात घेतले तरी ज्यांचा मृत्यू झाला ते जिवंत होणार आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जर पोलिसांनी आधीच कारवाई करत अवैध दारु आणि विषारी दारु नष्ट केली असती तर अनेक कुटुंबाना आपल्या जवळची माणसं गमवावी लागली नसती. एका कुटुंबाने तर आपल्या घरातील चार जणांना गमावले आहे. हे केवळ आणि केवळ विषारी दारूमुळेच झालं आहे.
एकाच कुटुंबातील 4 जणांना विषारी दारू पिऊन मृत्यू
एकाच कुटुंबातील 4 जण दारू पिऊन आले आणि उलट्या करायला लागले. डॉक्टरकडे नेईपर्यंत सगळं संपलं, असं मृताच्या नातेवाईकांनी सांगितलं. पण ही दुर्दैवी वेळ पुणे पोलिसांमुळे आली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या मृत्यूला जेवढे दारु विक्रेते जबाबदार आहेत, तेवढेच जबाबदार पुणे पोलीस देखील आहेत, असं म्हटलं जात आहे. पुण्याचे सीपी आमितेश कुमार झाल्यापासून पुण्यात कायदाव्यवस्था बिघडल्याची टीका, रोहित पवारांसह अनेक नेत्यामंडळींसह सामाजिक कार्यकर्ते देखील करताना दिसत आहेत.












