Lalit Modi on Dawood Ibrahim Threats : आयपीएलचे संस्थापक आणि विवादास्पद क्रिकेट प्रशासक ललित मोदी यांनी एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, २०१० मध्ये ते भारत सोडण्यामागे बीसीसीआयशी संबंधित कायदेशीर प्रकरणे नव्हती, तर कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या जीवघेण्या धमक्या होत्या. मॅच फिक्सिंगविरोधातील आपल्या कठोर भूमिकेमुळे दाऊद त्यांच्या जीवावर उठला होता, असा दावा मोदींनी केला. एका मुलाखतीत ललित मोदी यांनी त्या रात्रीची संपूर्ण घटना सविस्तर सांगितली. ते म्हणाले, “तो दिवस माझ्यासाठी अत्यंत कठीण होता. मी गोव्याला माझ्या लीगल टीमसोबत गेलो होतो. बीसीसीआयने दिलेल्या कारण दाखवा नोटिसीला उत्तर देण्यासाठी २० वकीलांची टीम माझ्यासोबत होती. आम्ही एका पार्कमध्ये बसून उत्तराचा ड्राफ्ट तयार करत होतो.
विमानतळावर सिक्युरिटी गायब
गोव्याहून मुंबईला परतताना संध्याकाळी साडेपाच वाजता विमान मुंबई विमानतळावर उतरले. नेहमीप्रमाणे त्यांच्या खासगी कार विमानापर्यंत येण्याची आणि चारी बाजूंनी सुरक्षा व्यवस्था असायची. पण त्या दिवशी परिस्थिती वेगळी होती.“मी विमानातून खाली उतरलो. रिमोट पार्किंगमध्ये होतो. बाहेर कोणीच नव्हते. माझे बॉडीगार्ड, सुरक्षारक्षक किंवा हत्यारांनी सुसज्ज गाड्या कुठेही दिसल्या नाहीत. मी सर्वांना फोन लावला, पण सर्वांचे फोन स्विच ऑफ होते,” असे मोदींनी सांगितले. त्यांच्या खासगी सुरक्षारक्षकाला खाली पाठवले. तो परत येऊन म्हणाला, “सर, तुम्ही माझ्यासोबत चला.” त्यांनी विमानतळावरील बॅक गेटने बाहेर काढले. बॉडीगार्डने “बाथरूमला जाऊया” म्हणून त्यांना सुरक्षित ठिकाणी नेले.
पोलिस आयुक्तांचा इशारा
विमानतळावर तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त हिमांशु रॉय यांनी ललित मोदींची वाट पाहत होते. रॉय यांनी स्पष्ट सांगितले की, “आम्ही आता तुमचे संरक्षण करू शकत नाही. फक्त पुढच्या काही तासांपर्यंत एअरपोर्ट ते हॉटेलपर्यंत सुरक्षा देऊ शकतो. त्यानंतर तुम्ही स्वतः निर्णय घ्या.”त्यांच्या सल्ल्यानुसार मोदींना मुंबईतील फोर सिजन्स हॉटेलमध्ये सुरक्षितपणे नेण्यात आले.
हॉटेलमध्ये निर्णय आणि लंडनचा प्रवास
फोर सिजन्स हॉटेलमध्ये त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. लॉबी गर्दीने भरलेली होती आणि मोदींचे स्वतःचे ४० ते ५० बॉडीगार्ड तैनात होते. त्यांनी अनेक महत्त्वाच्या लोकांना फोन केले. या नावांची माहिती त्यांनी आपल्या बायोपिकसाठी राखून ठेवली आहे.“मला स्पष्ट सांगण्यात आले की भारतात माझ्या जीवाला धोका आहे. माझ्याकडे दोन पर्याय होते – एक तर गोळी खायची किंवा देश सोडायचा. त्यावेळी माझ्यावर भारतात कोणतेही कायदेशीर प्रकरण नव्हते. मी मध्यरात्री ब्रिटिश एअरवेजच्या विमानाने लंडनला जाण्याचा निर्णय घेतला,” असे ललित मोदी म्हणाले.
“मी पळालो नाही”
मोदींनी स्पष्ट केले की, ते पळपूटे नाहीत. दीड वर्षानंतर भारत सरकारने त्यांचा पासपोर्ट जप्त केला, तेव्हा ते जगभर फिरत होते. “जेव्हा लोक म्हणतात की मी भारतातून पळालो, तेव्हा मी ते मानत नाही. मी माझ्या जीवाच्या सुरक्षेसाठी गेलो,” असा त्यांचा दावा आहे.या मुलाखतीत ललित मोदी यांनी पुन्हा एकदा आपल्या विरोधात कोर्टात कोणतीही सक्रिय केस नसल्याचे सांगितले आणि मॅच फिक्सिंगविरोधातील आपल्या भूमिकेमुळे दाऊदकडून तीनदा हल्ल्याचे प्रयत्न झाल्याचेही उल्लेख केला.











