Indian Idol 16 Winner: ‘इंडियन आयडॉल 16’चे विजेतेपद पटकावणारी ज्योतिर्मयी नायक नेमकी कोण आहे? वाचा, जिंकल्यानंतर काय म्हणाली…
इंडियन आयडॉल 16’ची ट्रॉफी ज्योतिर्मयी नायक यांनी आपल्या नावावर केली आहे. विजयानंतर त्यांनी व्यक्त केलेला आनंद, संघर्ष आणि पुढील स्वप्नांबद्दल काय सांगितले? जाणून घेऊया
लोकप्रिय गायन रिअॅलिटी शो ‘ इंडियन आयडॉल १६’ च्या विजेतेपदावर ओडिशाच्या ज्योतिर्मयी नायक हिने आपले नाव कोरले आहे. संपूर्ण स्पर्धेदरम्यान आपल्या सुरेल आवाजाने आणि दमदार सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या ज्योतिर्मयीने अखेर ट्रॉफीवरही नाव कोरले. विजेतेपद मिळाल्यानंतर तिने हे यश भगवान जगन्नाथ, आई- वडील आणि प्रेक्षकांना समर्पित केले.
विजयाचा आनंद व्यक्त करताना…
विजेतेपद जिंकल्यानंतर ज्योतिर्मयी म्हणाली, “ओडिशासाठी ही ट्रॉफी जिंकणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. प्रेक्षकांचे प्रेम, भगवान जगन्नाथांचा आशीर्वाद आणि माझ्या आई- वडिलांचे पाठबळ यामुळेच हे स्वप्न पूर्ण झाले.”
तिने पुढे सांगितले की, शो संपल्यानंतर तिला सर्वाधिक मते मिळाल्याची माहिती टीमकडून देण्यात आली. प्रेक्षकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळेच हा किताब जिंकता आल्याचे तिने नमूद केले.
देवावरील श्रद्धा आणि मेहनत हेच यशाचे रहस्य
आपल्या यशाबद्दल बोलताना ज्योतिर्मयी म्हणाली, “प्रत्येक यशामागे ईश्वराचा आशीर्वाद असतो. गाण्याची कला ही देवी सरस्वतीची देणगी आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यातील प्रत्येक यश मी देवाला समर्पित करते.”
तिने स्पर्धेदरम्यान सातत्याने मेहनत घेतली आणि प्रत्येक सादरीकरण अधिक चांगले करण्याचा प्रयत्न केला, असेही सांगितले.
कोण आहे ज्योतिर्मयी नायक?
24 वर्षीय ज्योतिर्मयी नायक ही ओडिशाची रहिवासी असून ती लहानपणापासूनच संगीताशी जोडलेली आहे. इंडियन आयडॉलमध्ये सहभागी होण्यापूर्वी तिने ओडिया संगीत क्षेत्रात अनेक गाणी गायली असून, तिच्या आवाजाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली आहे.
स्पर्धेदरम्यान तिने शास्त्रीय, सूफी, रोमँटिक, लोकसंगीत आणि चित्रपटगीत अशा विविध प्रकारच्या गाण्यांचे सादरीकरण करून आपली अष्टपैलू गायनशैली सिद्ध केली.
अंतिम फेरीत ठरली सर्वांची पसंती
ग्रँड फिनालेमध्ये अव्वल स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत झाली. मात्र, आपल्या प्रभावी सादरीकरणामुळे ज्योतिर्मयीने परीक्षकांसह प्रेक्षकांचीही मने जिंकली आणि विजेतेपद पटकावले.
या पर्वात तनिष्क शुक्ला प्रथम उपविजेता, तर मनराज वीर सिंह द्वितीय उपविजेता ठरला. शोचे परीक्षण श्रेया घोषाल, विशाल ददलानी आणि बादशाह यांनी केले, तर सूत्रसंचालन आदित्य नारायण यांनी केले.
पुढील ध्येय काय?
विजेतेपद मिळाल्यानंतर ज्योतिर्मयीने आता हिंदी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायिका म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याची इच्छा व्यक्त केली. भविष्यात आघाडीच्या अभिनेत्रींसाठी गाणी गाण्याचे स्वप्न असल्याचे सांगत तिने प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच हा प्रवास शक्य झाल्याची भावना व्यक्त केली.








