Stock Market Crash : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल देशवासियांना संबोधित करताना काही महत्त्वाची आवाहने (PM Modi Appeal) केली. त्यामध्ये अत्यावश्यक कारणांशिवाय परदेश प्रवास टाळावा आणि पुढील एक वर्ष सोने खरेदी करू नये, असे स्पष्ट आवाहन करण्यात आले. मोदींच्या या विधानाचा परिणाम आज थेट भारतीय शेअर बाजारावर (Indian stock market) पाहायला मिळाला. ११ मे रोजी बाजार उघडताच गुंतवणूकदारांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं आणि शेअर बाजार मोठ्या प्रमाणात (Decline in the Stock Market) घसरला.
राष्ट्रीय शेअर निर्देशांक तब्बल २५० अंकांनी घसरला, तर मुंबई शेअर निर्देशांक ८०० हून अधिक अंकांनी कोसळून थेट ७६ हजार ४५० वर बंद झाला. बाजारातील जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये विक्रीचा दबाव दिसून आला. विशेषतः विमान वाहतूक, बँकिंग आणि दागिने क्षेत्रातील समभागांमध्ये मोठी घसरण झाली.
हेही वाचा – “जर युरेनियम साठ्यांच्या जवळ गेला तर…”, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी, दिला गंभीर इशारा
अनेक नामांकित कंपन्यांची ३ टक्क्यांपेक्षा जास्त घसरण
आज सर्वाधिक घसरण झालेल्या कंपन्यांमध्ये इंटरग्लोब एव्हिएशन, टायटन कंपनी आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांचा समावेश होता. या कंपन्यांच्या समभागांमध्ये ३ टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली. दुसरीकडे टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सच्या समभागांमध्ये ६ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आणि ही कंपनी बाजारातील मोजक्या तेजीत असलेल्या कंपन्यांपैकी एक ठरली.
इराण आणि अमेरिका तणावामुळे परिस्थिती गंभीर
दरम्यान, जागतिक स्तरावर सुरू असलेल्या इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने दिलेला शांतता चर्चेचा प्रस्ताव फेटाळल्याने युद्धजन्य वातावरण अधिक तीव्र झालं. त्याचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवर झाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १०५ डॉलरवर
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर तब्बल साडेतीन टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल १०५ डॉलरवर पोहोचले आहेत. वाढत्या तेल दरांमुळे जागतिक बाजारपेठेत चिंतेचं वातावरण आहे. त्याचाच परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि शेअर बाजारावर दिसून येत आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने भारतीय रुपयावरही दबाव आला असून आज सकाळच्या सत्रात रुपया ४० पैशांनी घसरल्याचं पाहायला मिळालं.
जागतिक अर्थव्यवस्थेसह भारतीय बाजारालाही मोठा फटका
गेल्या दोन महिन्यांपासून होर्मुज खाडीतील तणावामुळे तेल पुरवठ्यावर परिणाम होत आहे. आता त्यात आणखी वाढ झाल्याने भविष्यात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, लवकरात लवकर युद्धविराम झाला नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेसह भारतीय बाजारालाही मोठा फटका बसू शकतो.












