Kolhapur POCSO case: कोल्हापूरात अल्पवयीन मुलीशी विवाह केल्याप्रकरणी २५ वर्षीय तरुणाला अटक कारण्यात आली आहे. विवाहानंतर मुलगी गर्भवती झाल्याचे समोर आल्यानंतर नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
कोल्हापूरात अल्पवीयन मुलीशी विवाह करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपावरून २५ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात मुलगी गर्भवती झाल्यानंतर नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. राजारामपुरी पोलिसांनी आरोपीविरोधात POCSO आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली आहे.
तक्रारीनंतर प्रकरण समोर
मिळालेल्या माहितीनुसार, आकाश उर्फ टल्ली सुभाष पाटोळे (२५) याचा एका अल्पवयीन मुलीसोबत विवाह झाला होता. विवाहाच्या वेळी संबंधित मुलीचे वय १६ वर्षे १६ दिवस असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आल्याचे सांगितले जात आहे.
विवाहानंतर दोघे पती- पत्नीप्रमाणे राहत होते. याच काळात मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार तिच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
पतीविरोधात गंभीर कलमांखाली कारवाई
तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली. अल्पवयीन मुलीशी विवाह केल्याचा तसेच तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप असल्याने पोलिसांनी आरोपी आकाश पाटोळे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
१० ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याच्यावर POCSO कायदा तसेच बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजारामपुरी पोलीस करत आहेत.
बालविवाहाविरोधात कायदा काय सांगतो?
भारतात मुलीच्या विवाहासाठी किमान वय १८ वर्षे आणि मुलाच्या विवाहासाठी किमान वय २१ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे १८ वर्षांखालील मुलीचा विवाह हा कायद्याने बालविवाहाच्या कक्षेत येतो.
अल्पवयीन मुलीशी विवाह करणे किंवा तिचे लग्न लावून देणे याबाबत संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्याचबरोबर अल्पवयीन मुलीशी लैंगिक संबंध असल्यास POCSO कायद्याच्या तरतुदी लागू होऊ शकतात.
या घटनेमुळे कोल्हापुरात बालविवाहाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, अल्पवयीन मुलांचे विवाह रोखण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि जनजागृतीची गरज अधोरेखित झाली आहे.









