• Home
  • महाराष्ट्र
  • आपला एक व्यक्ती नाही, याची जाणीव होत आहे; धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण..
Top News

आपला एक व्यक्ती नाही, याची जाणीव होत आहे; धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण..

Dhananjay Munde Speech

Valmik Karad remembered  : राज्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. यातच राज्यात काही नगरपंचायती आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाचे नेते मंडळी राज्यभरातील विविध शहरात जाऊन सभा घेत आहेत. नगरपंचायती आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. धनंजय मुंडे यांनी परळी येथील सभेत केलेल्या एका वक्तव्याने संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होत आहे. आपला एक व्यक्ती नाही, याची जाणीव होत असल्याचं म्हणत, मुंडेंनी खळबळ उडवून दिली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या गुन्हात जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या वाल्मिक कराडची धनंजय मुंडेंना आठवण येत असल्याचे भरसभेत म्हणल्याने पुन्हा एकदा मनोज जरांगे आणि धनंजय मुंडे संघर्ष होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

या पार्श्वभूमीवर आज परळीत महायुतीची एक सभा पार पडली. या सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा आमदार धनंजय मुंडे यांनी मोठं भाष्य केलं. तसेच परळीच्या विकासाच्या मुद्यांवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना धनंजय मुंडे यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केलं. पण यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी केलेल्या एका विधानाची मोठी चर्चा रंगली आहे.

हेही वाचा –  १० बाय १० च्या खोलीत ५० मतदार, याद्यांमध्ये घोळ; आदित्य ठाकरेंचा आयोगावर गंभीर आरोप

धनंजय मुंडे काय म्हणाले?

“१२ महिने जगमित्र कार्यालय सुरू होतं. जे काय असेल, नसेल आपण गोरगरिबांना मदत करत होतो. पण आज ९ ते १० महिने झाले, कार्यालय सुरू आहे. काम देखील सुरू आहे. पण हे सर्व बोलत असताना आपल्याबरोबर आपला एक व्यक्ती नाही, याची जाणीव पण होत आहे. माझ्या सारख्या एका कार्यकर्त्याला आणि सहकाऱ्याला सहकारी म्हणून आजच्या कार्यक्रमात मला याची जाणीव करून द्यावी लागते. काय चुकलंय, काय नाही ते न्यायालय पाहिलं. याची देखील जाणीव मला नक्कीच आहे”, असं धनंजय मुंडे यांनी सभेत बोलताना म्हटलं आहे.

धनंजय मुंडे सारखा नीच माणूस नाही – मनोज जरांगे 

धनंजय मुंडे असे काही बोलले असतील तर त्यांच्यासारखा नीच माणूस नाही, संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करून त्याला उणीव भासत असेल तर त्या धनंजय मुंडे इतका नीच माणूस या पृथ्वीतलावर असूच शकत नाही. तो मित्र असो किंवा सोयरा असो, जर त्याने वाईट कृत्य केले असेल तर त्याचं समर्थन कधीच करू नये. अजित पवार यांचे आता तरी डोळे उघडले पाहिजे. धनंजय मुंडे यांना किती पाठीशी घालणार आहात? अजूनही अजित पवार यांचे डोळे उघडले तर बरे होईल. गोरे गरिबांचे मुडदे पाडणाऱ्यांना अजित पवारांनी, देवेंद्र फडणवीस यांनी किती पाठीशी घालायचं? अस थेट सवालच आता मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

शब्दातून का होईना धनंजय मुंडे उघडे पडले..

शब्दातून का होईना धनंजय मुंडे उघडे पडले आहेत, गुंडागर्दी, भ्रष्टाचार करणे, दारू पिऊन पोरांना त्रास देणे, त्यांच्या समाजातील काही लोकांना गुन्हेगारीकडे वळून, ब्लॅकमेल करून आपला संसार उभा करणे, असे भयंकर पाप कराड करत होता, आणि धनंजय मुंडे हे गुंडगिरीमधून राजकारण उभं करत होते, असा माणूस अजिबात चांगला नाही, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आता डोळे उघडले पाहिजेत, नाहीतर तुम्हीसुद्ध धनंजय मुंडे यांच्या पापात खाक होताल, अशा इशाराच आता जरांगे पाटील यांनी दिला आहे.

वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हालत नव्हतं – सुषमा अंधारे

“धनंजय मुंडे यांच्या बरोबर गेले अनेक वर्ष वाल्मिक कराड सावली सारखं वावरलेला माणूस आहे. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम असो किंवा अजित पवारांच्या सभा असो किंवा परळीतील छोट्यातील छोटा कार्यक्रम असो किंवा मोठ्यातील मोठी सभा असो, याचं सर्व नियोजन हे वाल्मिक कराडकडे असायचं. आता हे देखील खरं आहे की एकेकाळी वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हालत नव्हतं. त्यामुळे अशा व्यक्तीची नेमकं निवडणुकीच्या काळात आठवण येणं स्वभाविक आहे”, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts