World Hottest Cities : भारतातील अनेक राज्यांमध्ये तीव्र उष्णतेची लाट पसरली आहे. AQI नुसार, जगातील 20 सर्वात उष्ण ठिकाणांपैकी 19 ठिकाणं भारतात आहेत. हवामान विभागानं म्हटलं आहे की, 22 एप्रिल ते 24 एप्रिल या कालावधीत अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. या काळात कमाल तापमान आणखी वाढून 43 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : केईएम हॉस्पिटलला नवं नाव देणार? मंगलप्रभात लोढा यांचा पालिकेकडे प्रस्ताव
आज जगातील सर्वात उष्ण शहरं कोणती :
या यादीत बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातील शहरांचा समावेश आहे, जिथं तापमानाने अत्यंत उच्च पातळी गाठली असून अनेक ठिकाणी ते 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. बिहारमधील भागलपूर, ओडिशातील तालचेर आणि पश्चिम बंगालमधील आसनसोल या यादीत अग्रस्थानी आहेत, या सर्व ठिकाणी 44 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली. त्यांच्यापाठोपाठ बिहारमधील बेगुसराय, मोतिहारी, मुंगेर, भोजपूर आणि सिवान यांसारखी अनेक शहरे, तसंच पश्चिम बंगाल आणि पूर्व उत्तर प्रदेशातील काही भागांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नेपाळमधील लुंबिनी हे पहिल्या 20 ठिकाणांमध्ये असलेले एकमेव गैर-भारतीय ठिकाण आहे.
कशामुळं होते तीव्र उष्णता निर्माण :
हवामानशास्त्रज्ञांच्या मते, या तीव्र उष्णतेमागे अनेक घटकांचं मिश्रण कारणीभूत आहे. याचं एक प्रमुख कारण म्हणजे जमिनीवर पडणारी तीव्र सूर्यकिरणे, ज्यामुळं एप्रिल महिन्यात, जो साधारणपणे मान्सूनपूर्व उन्हाळा मानला जातो, जमिनीच्या तापमानात झपाट्यानं वाढ झाली आहे. उत्तर आणि मध्य भारतातील बहुतांश भागांमध्ये निरभ्र आकाश असल्यामुळं सौर किरणोत्सर्ग (सूर्याची किरणं) कोणत्याही अडथळ्याशिवाय जमिनीवर पोहोचतो, ज्यामुळं उष्णता आणखी वाढते.
वाढत्या हवामान अस्थिरतेचं लक्षण :
हवामानशास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की, तीव्र तापमानाचं हे केंद्रीकरण वाढत्या हवामान अस्थिरतेचं लक्षण आहे. जगातील निम्म्याहून अधिक सर्वात उष्ण शहरं आता भारतात आहेत. एप्रिल महिना जसजसा पुढं जाईल, तसतसे येणारे आठवडे आव्हानात्मक असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सध्या चंद्रपूर 42 अंश सेल्सिअस तापमानासह सर्वाधिक उष्ण शहरं ठरलं आहे. तर बहुतांश शहरांत पारा 40 च्या पार गेल्यानं नागरिकांना उकाडा सहन करावा लागतोय.




