Deool Band 2 Release: 11 वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेला देऊळ बंद 2 (Deool Band 2) सध्या चांगलाच चर्चेत आहे. दिग्दर्शक Pravin Tarde यांच्या या चित्रपटाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत असून, आता पहिल्या भागातील लोकप्रिय पात्र ‘राघव शास्त्री’च्या पुनरागमनामुळे चाहत्यांमध्ये आणखी उत्साह निर्माण झाला आहे.
मोहन जोशी गश्मीरला भेटायला आले
सोशल मीडियावर सध्या एक खास व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी (Mohan Joshi) आणि अभिनेता गश्मीर महाजनी ( Gashmeer Mahajani) यांची खास भेट पाहायला मिळते. व्हिडिओमध्ये मोहन जोशी गश्मीरला विचारताना दिसतात की, सगळे मला विचारतायत, राघव शास्त्री ‘देऊळ बंद २’ मध्ये दिसणार ना?’ त्यावर गश्मीर मिश्किल अंदाजात म्हणतो, “तुमची इच्छा काय आहे? मी यावं का नाही?”
संवादाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले
यानंतर मोहन जोशी म्हणतात, “तू यावंस हीच माझी आणि प्रेक्षकांची इच्छा आहे,” त्यावर गश्मीर हात जोडत म्हणतो, “जर ही स्वामींची इच्छा असेल, तर मला यावंच लागेल.” या संवादाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले असून, व्हिडिओला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत आहे.
21 मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात यावेळी एका महिला शेतकऱ्याची संघर्षमय कथा मांडण्यात आली आहे. दुष्काळ, शेतकरी आत्महत्या आणि देवाला थेट प्रश्न विचारणारी स्त्री अशी दमदार कथा चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री स्नेहल तरडे (Snehal Tarde) महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असून, मोहन जोशी पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थांच्या भूमिकेत दिसणार आहेत.











