Deool Band 2: आज २१ मे, गुरुवार रोजी ‘देऊळ बंद २’ हा मराठी चित्रपट सर्वत्र रिलीज झाला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटगृहांमध्ये हाऊसफुलची चर्चा सुरू झाली आहे. चला तर जाणून घेऊया हा चित्रपट कसा आहे.
प्रवीण तरडे दिग्दर्शित बहुप्रतिक्षित चित्रपट “देऊळ बंद २” आज २१ मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटगृहांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली असून अनेक ठिकाणी हाऊसफुल बोर्ड लागल्याची माहिती समोर येत आहे.
शेतकऱ्यांचा संघर्ष आणि अध्यात्माचा संगम
देऊळ बंद २ मध्ये यावेळी कथा अधिक सामाजिक आणि भावनिक विषयाभोवतो फिरते. या भागात शेतकरी आणि देव यांच्यातील संवादाच्या माध्यमातून बदलत्या परिस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे.
चित्रपटात शेतकऱ्यांच्या समस्या, आत्महत्यांचे प्रश्न आणि त्यावर उपाय शोधण्याचा संदेश देण्यात आला आहे. आत्महत्या करून प्रश्न सुटत नाहीत, तर शेतीत बदल आणि नवे विचार स्वीकारणे आवश्यक आहे, असा ठळक संदेश चित्रपटातून दिला जातो.
दमदार स्टारकास्ट आणि विशेष भूमिका
चित्रपटात अनेक दिग्ग्ज कलाकारांची फौज आहे. विशेष म्हणजे मोहन जोशी यांनी श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारली आहे. तर स्नेहल तरडे शेतकरी महिलेच्या भूमिकेत दिसत आहेत. दिग्दर्शन, कथा आणि संवाद प्रवीण तरडे यांनीच सांभाळले आहेत, ज्यामुळे चित्रपटाला वेगळा टच मिळतो.
‘देऊळ बंद १’चा प्रवास
२०१५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘देऊळ बंद’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्या भागात नास्तिक शास्त्रज्ञ आणि श्रद्धा यांच्यातील संघर्ष दाखवण्यात आला होता.
नासा शास्त्रज्ञ राघव शास्त्री भारतात परतल्यानंतर मंदिर बंद करण्याचा प्रयत्न करतो, पण स्वामी समर्थ मानवी रूपात येऊन त्याचे आयुष्य बदलतात—ही कथा प्रेक्षकांना खूप भावली होती.
‘देऊळ बंद २’ची स्टारकास्ट
या चित्रपटात प्रवीण तरडे, स्नेहल तरडे, मोहन जोशी, महेश मांजरेकर, प्रसाद ओक, मंगेश देसाई, ओम भूतकर, संस्कृती बालगुडे आणि इतर अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
विशेष बाब
दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी चित्रपटातून मिळणारे उत्पन्न शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी वापरण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे चित्रपटाला सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्त्व प्राप्त झाले आहे.









