Sharad Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील ८ खासदार लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी ही भेट होणार असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. दरम्यान, या भेटीवर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
शरद पवार गटाचे खासदार सोमवारी सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रातील प्रश्नांसोबतच FCRA विधेयकाबाबतही पक्षाची भूमिका पंतप्रधानांसमोर मांडली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
या भेटीवर बोलताना नाना पटोले यांनी शरद पवार यांच्या पक्षाला स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचं स्पष्ट केलं. मात्र, त्याचवेळी त्यांनी सरकारला पाठिंबा देताना दीर्घकालीन परिणामांचाही विचार करण्याचा सल्ला दिला.
‘कोणाला भेटायचं हा त्यांचा निर्णय’
भंडारा येथे माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी शरद पवार गटाच्या खासदारांच्या मोदी भेटीवर भाष्य केलं.
“शरद पवारांचा स्वतंत्र पक्ष आहे. कोणाला भेटायचं आणि कोणाला भेटायचं नाही, हा त्यांचा विषय आहे,” अशी भूमिका पटोले यांनी मांडली.
मात्र, मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या मुद्द्यावर त्यांनी भाजप आणि आरएसएसवर जोरदार टीका केली. या माध्यमातून देशाच्या घटनात्मक व्यवस्थेवर परिणाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
‘थोड्याशा फायद्यासाठी सरकारला मदत करू नका’
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरही नाना पटोले यांनी सरकारवर प्रश्न उपस्थित केले. २०२३ मध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी २०२४ मध्ये का झाली नाही, असा सवाल त्यांनी केला.
महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे करून मतदारसंघ पुनर्रचनेची प्रक्रिया राबवली जात असल्याचा आरोप पटोले यांनी केला. यामुळे देशाच्या घटनात्मक रचनेवर परिणाम होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला.
“थोड्याशा फायद्यासाठी सरकारला मदत करू नका,” असं आवाहन त्यांनी सर्व राजकीय पक्षांना केलं. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला विरोध करण्याची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.









