Rohini Khadse slams Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नुकतेच देशाला संबोधित करताना जागतिक आर्थिक अस्थिरता आणि ऊर्जा संकटाचा हवाला देऊन जनतेला काही कठोर नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. मात्र, या आवाहनानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटच्या नेत्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधानांवर थेट निशाणा साधला असून, “नेत्यांनी आधी स्वतःला शिस्त लावावी, मग जनतेला उपदेश करावा,” अशा शब्दांत त्यांची कानउघाडणी (A Stern Reprimand) केली आहे. आधी मोदींचं जनतेला आव्हान. मग खडसेंचं थेट मोदींना आव्हान. हा सामना नेमका कसा रंगलाय हे या लेखातून पाहू…
जागतिक स्तरावर, विशेषतः आखाती देशांमधील तणावामुळे इंधनाचे दर आणि सोन्याच्या किमतींवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी देशाचे परकीय चलन वाचवण्यासाठी जनतेला सात महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करण्याचे आवाहन केले. यात प्रामुख्याने वर्षभर परदेश प्रवास टाळणे, सोन्याची खरेदी न करणे, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करून मेट्रो आणि इलेक्ट्रिक वाहनांकडे वळणे, तसेच कंपन्यांनी पुन्हा ‘वर्क फ्रॉम होम’ आणि ‘व्हर्च्युअल मीटिंग’ संस्कृती अवलंबणे, अशा मुद्द्यांचा समावेश होता.
हेही वाचा – पंतप्रधान मोदी पुन्हा परदेश दौऱ्यावर; ‘या’ 5 देशांमध्ये होणार महत्त्वाच्या बैठका
रोहिणी खडसे यांनी आपली आक्रमक भूमिका मांडली
पंतप्रधानांच्या या भाषानंतर रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली आक्रमक भूमिका मांडली. त्यांनी या आवाहनाला ‘सोयीचे राजकारण’ असे संबोधले आहे. खडसे म्हणाल्या की, “काही दिवसांपूर्वीच पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या. तिथे सत्ता मिळवण्यासाठी भाजपने आणि स्वतः पंतप्रधानांनी अफाट शक्ती खर्च केली. अवाढव्य रॅली काढल्या, गल्लीबोळात रोड शो केले आणि पाण्याचा ओघ असल्यासारखा पैसा खर्च केला. तेव्हा देशाला कोणत्या संकटाची चाहूल लागली नव्हती का? तेव्हा कोरोना असो किंवा आर्थिक संकट, कशाचीही तमा न बाळगता उत्सव साजरे केले गेले. यावरून खडसेंनी एक खरमरीत पोस्ट केलीय…ज्यात त्या म्हणतात…
नरेंद्र मोदीजी यांनी देशातील जनतेला आवाहन केले आहे
1 – वर्षभर परदेश प्रवास बंद करा
2 – वर्षभर सोने खरेदी करू नका
3 – पेट्रोल, डिझेलचा वापर कमी करा
4 – मेट्रोचा वापर करा
5 – इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा
6 – वर्क फ्रॉम होम सुरू करा
7 – ऑनलाइन कॉन्फरन्सिंग, व्हर्च्युअल मीटिंग सुरू करा
पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये दणदणीत प्रचार काय केला, मोठ्या रॅली घेतल्या, रोड शो झाले… आता पंतप्रधान महोदयांना संकट दिसू लागले आहे का ? हे म्हणजे करून करून भागले आणि देव पूजेला लागले, अशी रोहिनी खडसे यांनी मोंदीवर टीका केलीय.
मर्यादाच घालायची आहे तर
1 – स्वतःच्या परदेश दौऱ्यांवर घाला
2 – सगळ्या मंत्र्यांसाठी जे व्हिआयपी कॉनव्हायवर घाला, त्यांनाही पब्लिक ट्रन्सपोर्टने फिरायला सांगा
3 – निवडणुकांमध्ये पैशांचा सुळसुळाट असतो तो बंद करा
4 – लाखो रुपयांचे कपडे घालणे बंद करा
5 – प्रायव्हेट जेट, हेलिकॉप्टर वापरणे बंद करा..
6 – आमदार खासदार खरेदी करण्यासाठी जे पैसे वापरता त्यावर आळा घाला
7 – हजारो कोटी रुपये जाहिरातींवर खर्च करता तो आधी बंद करा
सामान्य जनतेनेच का सगळे पाळावे ?
रोहिणी खडसे यांच्या या टीकेला सर्वसामान्यांकडूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी अशाच भावना व्यक्त केल्या आहेत की, प्रत्येक वेळी आर्थिक शिस्त पाळण्याची जबाबदारी केवळ मध्यमवर्गीय आणि गरीब जनतेवरच का टाकली जाते? पेट्रोलचे दर वाढले की ‘बचत करा’ असे सांगणे आणि दुसरीकडे निवडणुकांसाठी सरकारी यंत्रणेचा व पैशांचा वापर करणे, हे विसंगत असल्याचे मत अनेक स्तरातून व्यक्त होत आहे. एकूणच, पंतप्रधानांचे आवाहन देशहिताचे असल्याचे सरकारकडून सांगितले जात असले तरी, रोहिणी खडसे यांनी उपस्थित केलेले प्रश्न सरकारला निरुत्तर करणारे आहेत. “करून करून भागले आणि देव पूजेला लागले,” या त्यांच्या म्हणीतून त्यांनी सरकारची सद्यस्थिती स्पष्ट केली आहे. आता या टीकेला भाजप किंवा केंद्र सरकारकडून काय उत्तर मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मात्र, या वादामुळे आगामी काळात ‘आर्थिक शिस्त’ विरुद्ध ‘राजकीय उधळपट्टी’ हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.












