Sanjay Raut: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचा भडका उडाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषेदेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत वादग्रस्त विधान केले आहे.
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट आणि तीव्र शब्दांत टीका केली आहे. “लांडग्यांना ऑपरेशन टायगर म्हणू नका,” असे वादग्रस्त विधान करत त्यांनी सत्ताधारी पक्षांच्या कथित राजकीय रणनीती आणि पक्षांतर मोहिमांवर निशाणा साधला. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला असून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले आहेत. त्यांच्या या टीकेमुळे “ऑपरेशन टायगर” या संकल्पनेवरही पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा: २ जुलैला महाराष्ट्रासह अनेक राज्यांत पाऊस आणि वादळी वाऱ्याचा अंदाज; जाणून घ्या तुमच्या भागाचा अंदाज
ऑपरेशन कमळ” आणि “ऑपरेशन टायगर” वर टीका
यावेळी राऊत यांनी “ऑपरेशन कमळ” आणि “ऑपरेशन टायगर” या राजकीय रणनीतींवर टीका करत, “सत्ताधाऱ्यांमध्ये एक दिवस ऑप्शन कमळही होणार” असा दावा केला. तसेच हे सर्व प्रकार सत्तेच्या आतच घडत असल्याचे ते म्हणाले.
देशातील राजकारण सध्या खालच्या पातळीवर गेले आहे, असेही राऊत यांनी म्हटले. काही नेते सध्या वेगवेगळ्या ऐतिहासिक आणि आदर्श व्यक्तिमत्त्वांच्या भूमिकेत वावरत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
डॉ. अमोल कोल्हे बदल बोलताना म्हणाले की..
डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, ते मूळ पक्षातच राहतील आणि त्यांच्या भूमिकेबाबत सध्या सुरू असलेल्या चर्चांना फारसा अर्थ नाही. कोल्हे यांनी शिवसेनेत असताना निष्ठेने काम केले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, काही मतदारसंघांतील राजकीय समीकरणांवर भाष्य करताना राऊत यांनी “हा मतदारसंघ शिवसेनेचा प्रभाव असलेला आहे” असा दावा केला. अमोल कोल्हे यांच्या राजकीय हालचालींबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरे काही बाबतीत योग्य बोलले
राज ठाकरे यांच्या काही वक्तव्यांचा संदर्भ देत राऊत (Sanjay Raut) यांनी त्यावरही टिप्पणी केली. ‘माल विकायला तयार आहेत ना, राज ठाकरे योग्य बोलले’, असे ही ते म्हणाले
डीएनए टेस्ट करावी लागेल
दरम्यान, खासदारकी आणि पक्षांतराच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी गंभीर आरोप करत “खासदार फोडण्यामागे काही नेत्यांचा सहभाग आहे” असा दावा केला. तसेच सध्याच्या राजकारणावर टीका करत “सगळ्यांचं एकदाच डीएनए टेस्ट करावी लागेल,” असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले.
अमित शहा आणि नरेंद्र मोदी वर टीका
सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत खळबळजनक वक्तव्य केले. ते म्हणाले, “मला वाटते की एक दिवस अमित शहा आणि नरेंद्र मोदी एकत्र बसून एकमेकांना म्हणतील की, ‘मी तुझा पक्ष फोडतो आणि तू माझा पक्ष फोड.’ शेवटी फोडण्यासाठी कोणीच उरणार नाही, ते स्वतःच आपलेच पक्ष फोडतील. ते इतके इतर पक्ष फोडण्याच्या ध्यासात आहेत की, पुढे भाजपलाच फोडण्याची वेळ येईल.”
राऊत यांनी पुढे आरोप करत सांगितले की, “25 ते 35 कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याच्या चर्चा आहेत. तामिळनाडूमध्ये TVK पक्षाचे 15 आमदार फोडण्याचा आणि सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला. हे लोक कधीच शांत बसत नाहीत. एक दिवस कोणताही पक्ष फोडला नाही तर त्यांना झोपही येत नाही.”
ते पुढे म्हणाले, “ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि निंदनीय आहे. देशातील लोकशाही इतक्या खालच्या पातळीवर गेली आहे की भविष्यातील पिढ्यांना सांगावे लागेल की या देशात कधी तरी खरी लोकशाही होती.”












