CM Suvendu Adhikari | पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून सुवेंदू अधिकारी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी एकापाठोपाठ एक मोठे निर्णय घेतले असून ते कामाला लागले आहेत. यामध्ये आता अवैध खाणकाम, तस्करीविरोधात मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी अधिकाऱ्यांना कठोर आदेश दिले आहेत.
हेही वाचा – आसाममध्ये सत्ता कायम! हिमंता बिस्वा सरमा पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान, 4 मंत्र्यांचा शपथविधीही पार
मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी नेमके काय दिले निर्देश?
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी राज्यभरातील कथित टोळीयुद्ध, अवैध वाळू आणि कोळसा खाणकाम तसेच जनावरांच्या तस्करीविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. पश्चिम बंगाल सचिवालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी एका बैठकीत अवैध कारवायांवर कडक देखरेख ठेवण्याच्या गरजेवर भर दिला. शासन राजकीय सूडबुद्धीपासून मुक्त राहील याची खात्री करण्याचे आवाहन त्यांनी सरकारला केले आहे.
मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी पोलीस अधिकाऱ्यांना राज्यातील विविध भागांमध्ये प्रचलित असलेली कथित साम्राज्यवादी राजवट संपुष्टात आणण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच त्यांनी अवैध वाळू उत्खनन आणि कोळसा खाणकामावर तातडीने कारवाई करण्याचेही आदेश दिले आहेत. सोबतच त्यांनी सीमावर्ती जिल्ह्यांमधील अधिकाऱ्यांना अवैध पशुधन तस्करीविरोधात निगराणी कडक करण्याचे आणि अशा कारवाया तात्काळ थांबवण्याचे निर्देश दिले आहेत.
सोमवारी कोलकाता येथे सुवेंदू मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली ज्यामध्ये मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी अनेक मोठे निर्णय घेतले. सुवेंदू सरकारने सीमा कुंपणासाठी बीएसएफला जमीन देण्याचा निर्णय घेतला. याव्यतिरिक्त, बंगालला केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेशी जोडले जाईल, राज्याला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेशी जोडले जाईल आणि बंगालमध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना सुरू केली जाईल.












