Nitin Gadkari | केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे त्यांच्या रोखठोख भूमिकांमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. आताही ते पुन्हा एकदा त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. नागपूर येथे आयोजित दोन दिवसीय जल क्रांती परिषदेला संबोधित करताना नितीन गडकरींनी खरं राजकारण कसं असतं? याबाबत मोठा खुलासा केला आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा – इंधन दरवाढीचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ, सर्वसामान्यांना बसणार मोठा फटका
नितीन गडकरी नेमंक काय म्हणाले?
नितीन गडकरी आपल्या जल क्रांती परिषदेतील आपल्या भाषणात म्हणाले की, सध्या आपल्या राज्यात पावसाचे पाणी गोळा करून त्याचे संवर्धन करण्याची गरज आहे. पावसाचे पाणी हाच पाण्याचा एकमेव मोठा स्रोत आहे. जर आपण पावसाचे पाणी वाचवले तर ते पाणी आपल्याला वाचवेल. या तीन गोष्टींवर गावांची समृद्धी अवलंबून आहे. पाणी थांबवणे, ते साठवणे आणि वाहून जाण्याऐवजी ते जमिनीत मुरू देणे. पाणी हे जीवन आहे आणि केवळ पाणीच गावे, गरीब, मजूर आणि शेतकऱ्यांचे जीवन बदलू शकते, असं गडकरी म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, माझे मित्र म्हणतात की तुम्ही जे काम करत आहात त्याची आम्हाला माहितीच नसते. खरं तर राजकारणाचा नियम आहे की, एक रूपयाचं काम करायचं आणि दहा रूपयांची प्रसिद्धी मिळवायची. पण आम्ही इथे दहा रूपयांचं काम केलं तरी आम्ही लोकांना त्या कामाबाबत सांगितलं नाही, ही आमची कमरता होती, असं मोठं वक्तव्य नितीन गडकरींनी केलं आहे ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
वाहते पाणी धावण्यासाठी, वाहते पाणी थांबण्यासाठी, साचलेले पाणी पिण्यासाठी, गावातील पाणी गावात, शेतातील पाणी शेतात, घरातील पाणी घरात वापरले पाहिजे. असं जर केलं तर गावातील गरिबी दूर होईल. आता गावकऱ्यांनी दोन पिके तर काही ठिकाणी तीन पिके घ्यायला सुरुवात केली आहे. यामुळे सामाजिक-आर्थिक परिस्थिती बदलली आहे. त्यामुळ फक्त पाणीच शेतकऱ्याचे जीवन बदलू शकते, असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.












