Vijay Thalapathy: नीट (NEET) परीक्षेच्या मुद्द्यावर विजय थळपती यांनी केंद्र सरकारकडे ती पूर्णपणे रद्द करण्याची मागणी केली आहे. त्याचवेळी, दिल्लीतील आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटनेवरही त्यांनी प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर टीका केली आहे.
नीट (NEET) परीक्षेच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि तामिळगा वेत्री कळघम (tvk) पक्षाचे नेते विजय थळपती यांनी केंद्र सरकारवर टीका करत नीट परीक्षा पूर्णपणे रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांनी पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटनेवरही त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न
टीव्हीकेने सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले की, नीट परीक्षा सुरू झाल्यापासून तिच्या पारदर्शकतेवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांवर मानसिक ताण वाढत असून त्यांच्या उच्च शिक्षणाच्या संधी आणि भवितव्यावर परिणाम होत असल्याचा दावा पक्षाने केला आहे.
केंद्र सरकारकडे स्पष्ट मागणी
पक्षाच्या मते, दरवर्षी नीट परीक्षेशी संबंधित वाद आणि विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान चिंताजनक आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या परीक्षेचा पुनर्विचार करण्याऐवजी ती पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
राहुल गांधींच्या ताब्यावर टीका
दिल्लीतील आंदोलनादरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या घटनेवरही टीव्हीकेने नाराजी व्यक्त केली. पक्षाने ही कारवाई लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याचे म्हटले असून, शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार अबाधित राहायला हवा, असे मत व्यक्त केले.
विरोधकांचे आंदोलन सुरूच
नीट प्रकरणावरून केंद्र सरकारविरोधात विरोधी पक्षांनी राजधानीत आंदोलन छेडले आहे. या आंदोलनात राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी, अखिलेश यादव, सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांनी सहभाग घेतला. आंदोलनादरम्यान पोलिसांनी अनेक नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर या मुद्द्यावर राजकीय वातावरण आणखी तापले आहे.



