Gautam Gambhir slogans Team India defeat : दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाला 2-0 असा मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. संघाला प्रथम कोलकाता आणि नंतर गुवाहाटीत पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर विशेष टीका करण्यात येत आहे. म्हणूनच, गुवाहाटीत सामना संपल्यानंतर स्टेडियममधील काही प्रेक्षकांनी गौतम गंभीर विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.
पदावरुन काढून टाकण्याची मागणी :
केवळ चाहतेच नाही तर अनेक क्रिकेट तज्ज्ञही गौतम गंभीरच्या दृष्टिकोनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. गंभीरची संघ निवड आणि मैदानावर त्यानं वापरलेल्या रणनीतीनं सर्वांनाच गोंधळात टाकलं आहे. यामुळं गंभीरच्या प्रशिक्षणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून त्याला पदावरुन काढून टाकण्याची मागणी करण्यात येत आहे.
Indian fans chant slogans at the Guwahati stadium
“Gautam Gambhir Hay Hay”.#INDvsSA #GautamGambhir #TestCricket pic.twitter.com/YDnClJnwG6
— Mamta Jaipal (@ImMD45) November 26, 2025
पत्रकार परिषदेत गौतम गंभीर काय म्हणाला? :
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पराभवानंतर गौतम गंभीर पत्रकार परिषदेत उपस्थित राहिला. त्याला अनेक तीव्र प्रश्न विचारण्यात आले. गंभीरनं त्याच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाच्या मागील यशाचं स्पष्टीकरण दिलं. पत्रकार परिषदेत गौतम गंभीर म्हणाला, “माझं भविष्य बीसीसीआयला ठरवायचं आहे, पण मीच तो माणूस आहे ज्यानं तुम्हाला इंग्लंडमध्ये अनुकूल निकाल मिळवून दिले आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये प्रशिक्षकही होतो. प्रत्येकजण दोषी आहे आणि त्याची सुरुवात माझ्यापासून होते.” तो पुढं म्हणाला, “आपल्याला चांगलं खेळायचं आहे. पहिल्या डावात एका वेळी आपण एक बाद 95 धावा केल्या होत्या, ज्यानंतर सात बाद 122 धावा झाल्या. हे अस्वीकार्य आहे. तुम्ही एका व्यक्तीला किंवा एका विशिष्ट शॉटला दोष देऊ शकत नाही. प्रत्येकजण दोषी आहे. मी कधीही कोणालाही दोष दिलेला नाही आणि भविष्यातही देणार नाही.”
हे ही वाचा : आज होणार WPL 2026 चा लिलाव; ₹41.10 कोटींची होणार उधळपट्टी
25 वर्षांनी आफ्रिकेविरुद्ध गमावली मालिका :
टेम्बा बावुमा यांच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेच्या संघानं बुधवारी (26 नोव्हेंबर) गुवाहाटी कसोटी 408 धावांनी जिंकली. 549 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया सामन्याच्या पाचव्या दिवशी 140 धावांवर गारद झाली. धावांच्या बाबतीत हा भारताचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा पराभव ठरला. दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात 489 धावा केल्या आणि दुसऱ्या डावात 260/5 धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर भारतासमोर 549 धावांचं लक्ष्य होतं. भारतीय संघ पहिल्या डावात फक्त 201 धावांवरच मर्यादित राहिला. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या 25 वर्षांत दक्षिण आफ्रिकेचा भारतात पहिलाच कसोटी मालिका विजय होता. शिवाय, 25 वर्षांत पहिल्यांदाच आफ्रिकन संघानं भारताला 2-0 नं व्हाईटवॉश दिला.












