Prakash Ambedkar attack on Sharad Pawar : सध्या राज्यातील २९ महानगर पालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपासून सर्वच पक्षांचे बडे नेते प्रचारात व्यस्त आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही प्रचाराला सुरुवात केली आहे. आज परभणी महानगरपालिकेच्या अनुषंगाने परभणीत आंबेडकरांची सभा पार पडली. या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर जहरी टीका केलीय. आंबेडकर म्हणाले की, ‘काँग्रेसकडे आता मतदार उरला नाहीये, केवळ मुस्लिम मतदार त्यांच्याकडे राहिलाय. तुम्ही इतके दिवस शरद पवारांच्या नादी लागतात, म्हणजे दाऊद इब्राहिमच्या नादी लागलात, म्हणून तुमची अशी अवस्था झाली आहे, अशी टीका त्यांनी केलीय.
हेही वाचा – विकास कामाच्या श्रेयवादावरून भाजप-शिंदे आणि ठाकरे बंधु यांच्यात वादाची ठिकणी
काँग्रेसकडे आता काही राहील नाहीये – आंबेडकर
‘इथल्या मुस्लिमांना आवाहन आहे, काँग्रेसकडे आता काही राहील नाहीये, फक्त मुस्लिम मतदार उरला आहे. काँग्रेस शरद पवारांच्या नादी लागल्याने असं झालंय. शरद पवार म्हणजे दाऊद इब्राहीमच आहेत. आता काँग्रेसकडे मतदार नाही, तेव्हा उद्याच्या व्यवस्थेमध्ये संविधान टिकलं पाहिजे असं वाटत असेल तर मुस्लिमांनी वंचितच्या उमेदवाराला मतदान केलं पाहिजे,’ असं आंबेडकर म्हणाले.
शिक्षण घ्या आणि सत्ताधारी बना, असा संदेश
यावेळी बोलताना बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, जोपर्यंत वंचित घटकांचे प्रतिनिधी कायदेमंडळात जात नाहीत, तोपर्यंत खऱ्या अर्थाने बदल शक्य नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व मागासवर्गीयांना शिक्षण घ्या आणि सत्ताधारी बना, असा संदेश दिला होता, असंही त्यांनी सांगितलं. वंचितांचा महापौर निवडून आणायचा असेल, तर जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणणं आवश्यक आहे. फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेला मानणाऱ्या मतदारांनी १०० टक्के मतदान केल्यास वंचित बहुजन आघाडीचे पॅनल निवडून येऊ शकते, असं त्यांनी स्पष्ट केलं. वंचित बहुजन आघाडीच्या जास्तीत जास्त उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थितांना केलं.
हुकूमशाहीला सुरुवात झाली आहे
या सभेनंतर प्रकाश आंबेडकर यांनी बिनविरोध नगर सेवकांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना आंबेडकर म्हणाले की, हुकूमशाहीला सुरुवात झाली आहे. आमदारांनी उमेदवारांना दमदाटी करून पळवले आहे. काही ठिकाणी विकत घेतले आहेत. अर्ज माघारी घेण्याची सिस्टीम आता बंद केली पाहिजेत अशी मागणी आम्ही करणार आहोत. तरच लोकशाही टिकेल असं आम्ही मानतो. या निवडणुकीत महायुतीतील पक्ष वेगळे लढत आहेत. यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भाजपला येथील राजकीय पक्ष संपवायचे आहेत. इलेक्शनच्या निमित्ताने आपल्याला यांना संपवता येईल असं त्यांना वाटतं आहे. म्हणून त्यांनी येती केली नाही. सत्ता आली नाही की पक्ष संपतात अशी परिस्थिती आहे. सगळीकडे अजित पवार युतीतून वेगळं लढतायेत. मुस्लिमांच मत विभाजन करण्याच ते बघतायेत.












