Vande Bharat Sleeper : केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली की कोलकाता ते गुवाहाटी दरम्यानची पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन 17 जानेवारीपासून धावेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमधील मालदा टाउनमध्ये याचं उद्घाटन करतील. ही ट्रेन कामाख्या ते हावडा जंक्शन दरम्यान आठवड्यातून सहा दिवस चालेल. रेल्वे मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, याच वेळी सहा नवीन अमृत भारत एक्सप्रेस देखील सुरु केल्या जातील, ज्यांची सेवा 17 आणि 18 जानेवारी 2026 रोजी सुरु होईल. दिल्ली इथं अति विशिष्ट रेल सेवा पुरस्कार सोहळ्यात बोलताना वैष्णव यांनी घोषणा केली की भारतीय रेल्वे 2026 मध्ये एक मोठे परिवर्तन घडवून आणेल, ज्यामध्ये सर्व प्रकारच्या सुधारणांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा व्यापक वापर समाविष्ट आहे.
काय म्हणाले रेल्वे मंत्री :
रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं की रेल्वेमध्ये तंत्रज्ञान आणि नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी एक नवीन संरचनात्मक दृष्टिकोन स्वीकारला जाईल. भारतीय स्टार्टअप्स आणि नाविन्यपूर्ण विचारांना रेल्वेमध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी एक नवीन संरचनात्मक दृष्टिकोन सुरु केला जाईल. या उद्देशानं एक तंत्रज्ञान नवोपक्रम पोर्टल सुरु केलं जाईल. देखभालीच्या कामांमध्ये AI चा मोठ्या प्रमाणात वापर केला जाईल.
वंदे भारत स्लीपरचं सुरुवातीचं तिकिट ₹2300 :
वंदे भारत स्लीपर (Vande Bharat Sleeper) ट्रेनच्या थर्ड एसी क्लासचं भाडे ₹2300 निश्चित करण्यात आलं आहे. दुसऱ्या एसी क्लासचे भाडे ₹3000 असेल. तर पहिल्या एसी क्लासचं भाडे सुमारे ₹3600 असण्याचा प्रस्ताव आहे. स्लीपर ट्रेनची रचना 1000 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या प्रवासासाठी करण्यात आली आहे. या वर्षाच्या अखेरीस सुमारे 12 वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार होतील. 30 डिसेंबर रोजी या ट्रेनची चाचणी घेण्यात आली. कोटा-नागदा रेल्वे ट्रॅकवर ही ट्रेन ताशी 180 किलोमीटर वेगानं धावली. लोको पायलटनं चार ग्लासमध्ये पाणी ठेवलं आणि इतक्या वेगात असूनही ग्लासमधून पाणी सांडलं नाही.
नवीन सुरु होणाऱ्या सहा अमृत भारत कोणत्या :
- 16107/16108 – तांबरम ते संत्रागाची
- 16597/16598 – सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या टर्मिनल बेंगळुरु ते अलीपुरद्वार जंक्शन
- 16523/16524 – सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या टर्मिनल बेंगळुरु ते बालुरघाट
- 16223/16224 – सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या टर्मिनल बेंगळुरू ते राधिकापूर
- 20603/20604 – न्यू जलपाईगुडी ते नागरकोइल जंक्शन
- 20609/20610 – न्यू जलपाईगुडी ते तिरुचिरापल्ली जंक्शन
52 आठवड्यात 52 सुधारणा :
दिल्ली इथं झालेल्या विशिष्ट सेवा पुरस्कार सोहळ्यात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली की 2026 मध्ये भारतीय रेल्वेमध्ये अनेक मोठ्या सुधारणा केल्या जातील. प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी नवीन पद्धती आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. रेल्वेमंत्र्यांनी पुढं सांगितलं की, या वर्षी 52 आठवड्यात 52 सुधारणा आणल्या जातील, ज्यामुळं येत्या काळात भारतीय रेल्वेला एक नवीन चेहरा मिळेल. ट्रेनमध्ये तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्णता एकत्रित करण्यासाठी एक नवीन संरचनात्मक दृष्टिकोन आणला जाईल आणि यासाठी एआयचा देखील मोठ्या प्रमाणात वापर केला जाईल.










