Rohit Pawar | अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची निवड करण्यात आली आहे. पण सुनेत्रा पवार यांना पक्षातील काही नेते कंट्रोल करत असल्याचा असल्याचा दावा आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे. अजितदादा असताना त्यांना पक्षावर वचक होता. आता त्यांच्या निधनानंतर सुनेत्रा काकींना आपण कंट्रोल करू, अशा भ्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही नेते आहेत, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा – सरकार FIR ला घाबरतंय? अजित पवारांच्या अपघात प्रकरणावर राज ठाकरेंचं भाष्य; म्हणाले, संशय आहे…
रोहित पवारांचा सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलांवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल
मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार म्हणाले, सुनेत्रा काकी या एक सक्षम महिला आहेत. त्यामुळे त्यांची ताकद काय आहे ते थोड्या दिवसांनी कळेल. त्यामुळे पक्षातील चार नेत्यांनी थोडं सांभाळून राहावं, असा थेट इशारा रोहित पवारांनी दिला आहे. यावेळी रोहित पवारांनी सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि प्रफुल पटले (Praful Patel) यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले.
अजितपर्व कधीही संपणार नाही…
पुढे रोहित पवार म्हणाले, काल एका महाशय बोलले की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवीन पर्व सुरू झाले आहे. जरी नवे पर्व सुरू झाले असले तरी अजितपर्व कधी संपणार नाही. दादांबद्दल लोकांच्या मनात कायम प्रेम राहिल. तसंच दादांच्या अपघाताविषयी लोकांच्या मनात शंका आहे.
अजितदादांच्या पक्षातील ते चार लोक आहेत, ते स्वत:चं महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी फक्त विलीनीकरणाच्या चर्चा घडवून आणत आहेत. आज सुनेत्रा काकी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. त्यामुळे काकींशी स्टेजवर वागत असताना इतर गोष्टी सांभाळून वागा, महाराष्ट्र बघत आहे. कालच्या कार्यक्रमामध्ये जयने कुठे बसायचे हे ठरवणारे ते नेतेच होते. तसंच कोणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतोय, कोण त्यांना ओढतोय, हे पाहून आम्हाला वाईट वाटलं. अजितदादांचा वचक काय आहे, हे सर्वांना माहिती आहे. अजितदादांचं सर्व आमदार, कार्यकर्त्यांवर प्रेम होतं, पण फक्त त्या चार लोकांवर त्यांचा वचक होता, असंही रोहित पवार म्हणाले.
सुनेत्रा काकींविषयी मला आदर आहे. त्या एक मोठ्या नेत्या आहेत आणि त्या अजितदादांसारखं काम करतील, असा विश्वास आहे. पण इतर नेत्यांनी त्यांच्याशी सांभाळून बोलावं आणि वागावं, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.












