Harish Rana | आज (11 मार्च) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मोठा निकाल दिला आहे. गाझियाबाद (Ghaziabad) येथील हरिश राणा (Harish Rana) याला सर्वोच्च न्यायालयाने इच्छामरणाची परवानगी दिली आहे. 13 वर्षांपासून हरिश राणा बेशुद्ध अवस्थेत अंथरूणाला खिळला होता. तर त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्यता नसल्याची माहिती एम्सने दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्याला इच्छामरण देण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा – लाडच्या बहिणींसाठी मोठी बातमी; फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र मिळणार? 3000 रुपये खात्यात जमा होणार?
हरिश राणाच्या आई-वडीलांनी त्याला इच्छामरण द्यावे म्हणून कोर्टात याचिका दाखल केली होती. तर या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निर्णय दिला आहे. एम्सने दिलेला रिपोर्ट बघितल्यानंतर न्यायालयाने हरिशला इच्छामरण देण्याची परवानगी दिली आहे.
न्यायालयाने हरिशला इच्छामरण देण्याची परवानगी का दिली?
सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणीवेळी हरिश राणाच्या आई-वडीलांसोबत संवाद साधला होता. हरिश हा 100 टक्के दिव्यांग असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची आशा त्याच्या आई-वडीलांनी सोडून दिली होती. त्यामुळे या त्रासातून आपल्या मुलाला मुक्त करण्यासाठी आई-वडीलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्याला इच्छामरण देण्याची मागणी केली होती.
हरिशच्या आई-वडिलांसोबत संवाद साधल्यानंतर न्यायालयाने एम्सच्या डॉक्टरांचा रिपोर्ट मागवला होता. तर हा रिपोर्ट आज न्यायालयात सादर करण्यात आला होता. या रिपोर्टमध्ये हरिश यापुढे कधीही ठीक होऊ शकत नाही, असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं होतं. हा रिपोर्ट पाहिल्यानंतर न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय घेत हरिशच्या इच्छामरणाला परवानगी दिली.
हा ऐतिहासिक निर्णय न्या.जेबी पारदीवाला आणि न्या. के वी विश्वनाथन यांच्या खंडपीठाने सुनावला. निर्णय देताना न्यायाधीश पारदीवाला हे भावूक झाले होते. भावूक होत ते म्हणाले की, हा खूप दु:खद रिपोर्ट आहे. आम्ही हरिशला प्रचंड दु:खात ठेऊ शकत नाही. हा निर्णय घेणं आमच्यासाठी कठीण आहे. आपण आज या स्टेजला आहोत जिथे आम्हाला अखेरचा निर्णय द्यावा लागणार आहे, असं पारदीवाला म्हणाले.
हरिशला नेमंक काय झालं होतं?
2013 साली हरिश चंदीगड येथे शिक्षणासाठी गेला होता. तिथे तो पेईंग गेस्ट हॉस्टेलच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडला होता. या दुर्घटनेत हरिशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तेव्हापासून तो बेशुद्ध अवस्थेत अंथरूणाला खिळून होता. शरीराची काहीही हालचाल होत नसल्यामुळे त्याच्या शरीरावर जखमा देखील झाल्या आहेत. 100 टक्के अपंगत्व आलेल्या हरिशच्या प्रकृतीत काहीच सुधारणा होत नसल्यामुळे त्याच्या आई-वडीलांनी तो बरा होण्याची आशा सोडून दिली आणि त्याला इच्छामरण देण्याची कोर्टात मागणी केली होती.












