New Maharashtra School Rules: शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल झाल्याचे दिसून येत आहे. आता नववी- दहावीच्या वर्गात किमान २० विद्यार्थ्यांची संख्या नसेल तर ते वर्ग बंद होऊ शकतात. काय आहेत हे नवीन नियम चला तर जाणून घेऊयात अधिक माहिती.
नुकताच १५ मार्च २०२४ रोजी झालेल्या शासन निर्णयानुसार, आता ३ किलोमीटरच्या परिसरात असलेल्या माध्यमिक शाळांमध्ये नववी आणि दहावीच्या प्रत्येक वर्गात किमान २० विद्यार्थ्यांची संख्या (पटसंख्या) नसल्यास ते वर्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, जर ३ ते ५ किमी अंतरात दुसरी शाळा उपलब्ध नसेल, तर अशा शाळांना या नियमातून तात्पुरती (१ वर्षासाठी) सवलत देण्यात येणार आहे.
सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांची २०२५-२६ वर्षासाठी संचमान्यता प्रक्रिया अंतिम टप्प्यात आले आहे. नव्या नियमानुसार, कमी पटसंख्येमुळे राज्यातील सुमारे ८ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे.
संचमान्यता पूर्ण झाल्यानंतर प्रथम अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन शिक्षणाधिकारी स्तरावर, त्यानंतर उपसंचालक स्तरावर केले जाईल. त्यानंतरच रिक्त पदांची भरती केली जाईल. नववी दहावीच्या वर्गांसाठी शिक्षण पदे मंजूर होण्यासाठी प्रत्येक वर्गात किमान २० विद्यार्थ्यांची अट अनिवार्य ठेवण्यात आली आहे.
या निर्णयामुळे सुमारे ६०० हुन अधिक शाळा बंद पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत २४ फेब्रुवारी २०२६ रोजी शिक्षण शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीत काही प्रमाणात अट शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासंबंधीचा शासन निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
बैठकीत घेतलेले प्रमुख निर्णय पुढीलप्रमाणे:
१) ज्या शाळांमध्ये नववी-दहावीच्या वर्गांसाठी शिक्षक मंजूर आहेत आणि ० ते ३ किमी परिसरात त्याच माध्यमाची दुसरी शाळा उपलब्ध आहे, अशा शाळांमध्ये प्रत्येक वर्गात किमान २० विद्यार्थी असणे बंधनकारक राहील. ही अट पूर्ण न झाल्यास शिक्षक पदे मंजूर केली जाणार नाहीत.
२) ज्या शाळांमध्ये शिक्षक मंजूर आहेत पण नववी-दहावीची पटसंख्या २०-२० नाही, आणि ३ ते ५ किमी परिसरात त्याच माध्यमाची दुसरी शाळा उपलब्ध नाही, अशा शाळांसाठी एकत्रित ४० विद्यार्थ्यांची अट ठेवण्यात आली आहे. ही अट पूर्ण केल्यास त्या शाळेला ३ शिक्षक पदे मंजूर केली जातील.
३) ज्या शाळांमध्ये नववी-दहावीची पटसंख्या २०-२० नाही आणि ५ किमीपेक्षा जास्त अंतरात दुसरी शाळा उपलब्ध नाही, अशा ठिकाणी दोन्ही वर्गांची एकत्रित किमान ३० विद्यार्थ्यांची अट लागू असेल. ही अट पूर्ण झाल्यास त्या शाळेला ३ शिक्षक पदे मंजूर केली जातील.












