PM Narendra Modi | आजकाल भारतातली बरेच लोक परदेशात जाऊन डेस्टिनेशन वेडिंग (Destination Wedding) करताना दिसतात. तसेच बरेचसे भारतीय नागरिक सुट्ट्यांमध्ये भारतातील ठिकाणे सोडून परदेशात फिरायला जाताना दिसतात. तर याच मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशातील नागरिकांना खास आवाहन केलं आहे. त्यांनी नागरिकांना परदेशात डेस्टिनेशन वेडिंग करण्याऐवजी आपले विवाह सोहळे भारतातच आयोजित करण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा – पंतप्रधान मोदी पुन्हा परदेश दौऱ्यावर; ‘या’ 5 देशांमध्ये होणार महत्त्वाच्या बैठका
भारतीय नागरिकांच्या वाढत्या परदेश दौऱ्यांवर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
गुजरातच्या वडोदरा येथे एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी भारतीय नागरिकांच्या वाढत्या परदेश दौऱ्यांवर आणि विवाहसोहळ्यांवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, परदेशात लग्न करण्याच्या या प्रवृत्तीमुळे आपल्या देशाच्या परकीय चलनाचा मोठा हिस्सा खर्च होत आहे. त्यामुळे भारतीय कुटुंबांनी सुट्ट्या आणि विवाहसोहळ्यांसाठी भारतांतर्गतच ठिकाणांचा शोध घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे. मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर परकीय चलन वाचवणे आणि देशांतर्गत अर्थव्यवस्थेला चालना देणे हा पंतप्रधान मोदींच्या या आवाहनाचा उद्देश आहे.
डेस्टिनेशन वेडिंगवरून पंतप्रधान मोदींनी उपस्थित केले सवाल
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आजकाल शाळेला सुट्ट्या लागल्या की मुलांच्या हातात परदेशात जाण्याची तिकिटे दिली जातात. आजकाल परदेश प्रवास करणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे, विशेषतः डेस्टिनेशन वेडिंगसाठी. तुम्ही लोकांनी एकदा स्वतःला विचारा की भारतात अशी कोणतीही जागा नाही का? जिथे आपण आपल्या सुट्ट्या घालवू शकू, जिथे आपण आपल्या मुलांना आपल्या इतिहासाबद्दल शिकवू शकू, जिथे आपल्याला आपल्या स्थानिक ठिकाणांचा अभिमान वाटेल? असा सवाल मोदींनी उपस्थित केला.
बरेचसे लोक भारत सोडून परदेशात जाऊन लग्न करतात. पण आपल्या भारतात होणाऱ्या विवाहसोहळ्यांना सांस्कृतिक आणि भावनिक महत्त्व आहे. जेव्हा भारतात लग्नसोहळा होतो तेव्हा आपल्या पूर्वजांची भूमी आपल्याला आशीर्वाद देते. तसेच भारतात लग्नासाठी अनेक सुंदर स्थळे आहेत, असंही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.












