Seat Sharing Dispute : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या १७ जागांसाठी विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. त्यातच आता महाविकास आघाडीने या सर्व १७ जागा पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्णय घेतला आहे. एकंदरीत पाहता महाविकास आघाडीचे मागून येऊन जागावाटप ठरलं आहे मात्र, महायुतीचे घोडं कुठं अडलंय तेच समजायला तयार नाही.
या पार्श्वभूमीवर मविआच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत एकूण १७ जागांपैकी १५ जागांवर जागावाटपाचे एकमत झाले असून, उर्वरित दोन जागांबाबत येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.
नुकतंच मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या ठिकाणी महाविकास आघाडीची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, अनिल परब, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. या बैठकीनंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी महाविकासआघाडी सर्व जागा लढणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट आणि अटीतटीचा सामना रंगणार हे आता स्पष्ट झाले आहे.
मविआच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार राज्यातील १५ जागांचा तिढा सुटला असून पक्षांनुसार संभाव्य जागावाटप खालीलप्रमाणे असणार आहे. यात काँग्रेस ८, शिवसेना ठाकरे गट ४ आणि राष्ट्रवादी शरद पवार गट ३ जागांवर निवडणूक लढणार आहे.
महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसच मोठा भाऊ
काँग्रेस (०८ जागा): चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा-गोंदिया, अमरावती, अहिल्यानगर (अहमदनगर), सोलापूर, धाराशिव-बीड-लातूर आणि नागपूरची पोटनिवडणूक.
शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गट (०४ जागा): रत्नागिरी, जळगाव, परभणी-हिंगोली, संभाजीनगर.
राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार गट (०३ जागा): पुणे, ठाणे, आणि सातारा-सांगली.
नाशिक आणि नांदेडवरून पेच कायम
या १५ जागांवर एकमत झाले असले तरी नाशिक आणि नांदेड या दोन मतदारसंघांवर मविआतील तिन्ही पक्षांनी काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटाने आपला दावा ठोकला आहे. यामुळे या दोन जागांवर अद्याप चर्चा सुरू आहे. येत्या दोन दिवसांत यावर पुन्हा एक बैठक घेऊन यावर सर्वसंमतीने अंतिम तोडगा काढला जाईल, अशी माहिती नेत्यांनी दिली आहे.












