Chaturmas 2026: हिंदू धर्मात चातुर्माला विशेष महत्व आहे. आषाढ महिन्यातील शुल्क पक्षातील देवशयनी एकादशीपासून या पवित्र काळाची सुरुवात होते. यंदा २५ जुलैपासून चातुर्मास सुरू होत असून, धार्मिक मान्यतेनुसार या काळात भगवान विष्णू योगनिद्रेत जातात.
हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक महत्त्व असलेल्या चातुर्मासाला उद्यापासून ( २५ जुलै २०२६) सुरुवात होत आहे. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील देवशयनी एकादशीपासून सुरू होणारा हा चार महिन्यांचा काळ भक्ती, साधना, संयम आणि आत्मचिंतनासाठी विशेष मानला जातो.
हेही वाचा: अखेर 26 दिवसांनंतर सोनम वांगचूक यांनी सोडलं उपोषण; सरकारसोबत चर्चेनंतर मोठा निर्णय
चातुर्मास म्हणजे काय?
चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मातील चार महिन्यांचा पवित्र काळ. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील देवशयनी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात होते आणि कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला त्याची समाप्ती होते.
धार्मिक मान्यतेनुसार, या काळात भगवान विष्णू योगनिद्रेत जातात आणि चार महिने विश्रांती घेतात. त्यामुळे या काळाला देवांच्या विश्रांतीचा कालावधी मानले जाते.
या काळात काय करावे?
या काळात उपवास, जप, पूजा आणि धार्मिक अनुष्ठानांना प्राधान्य द्यावे. तसेच सांसारिक ऐषआरामापासून दूर राहून संयम आणि भक्तीचे पालन करण्याची परंपरा आहे.
काय करू नये?
धार्मिक श्रद्धेनुसार भगवान विष्णूच्या विश्रांतीच्या काळात विवाह, गृहप्रवेश, साखरपुडा, मुंडन आणि इतर शुभ कार्ये केली जात नाहीत. देवउठनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू जागृत झाल्यानंतर पुन्हा मांगलिक कार्यांना सुरुवात होते.
भगवान विष्णू कुठे घेतात विश्रांती?
अनेकांना असा प्रश्न पडतो की, चातुर्मासाच्या काळात भगवान विष्णू क्षीरसागरातच विश्रांती घेतात का? धार्मिक कथांनुसार, या काळात भगवान विष्णू दैत्यराज बळीच्या पाताळ लोकात निवास करतात, अशी मान्यता आहे.
पौराणिक कथेनुसार, भगवान विष्णूंनी वामन अवतारात राजा बळीची परीक्षा घेतली होती. राजा बळीच्या दानशूर वृत्तीवर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी त्याला वरदान दिले. त्यानुसार वर्षातील चार महिने भगवान विष्णू त्याच्या पाताळ लोकात वास्तव्य करतील, अशी कथा सांगितली जाते.
चातुर्मास संपल्यानंतर शुभ कार्यांना सुरुवात
मान्यतेनुसार, देवउठनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होतात. त्यानंतर विवाह, गृहप्रवेश आणि इतर शुभ कार्यांसाठी पुन्हा अनुकूल काळ सुरू होतो.
चातुर्मास हा केवळ धार्मिक परंपरेचा भाग नसून आत्मचिंतन, संयम आणि अध्यात्मिक साधनेला महत्त्व देणारा काळ मानला जातो.









