Dam Water Release : सध्या राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक धरणे शंभर टक्के क्षमतेने भरली आहेत…धरण भरलं की लगेच दरवाजे उघडले जातात…अशी अनेकांची समजूत असते…पण प्रत्यक्षात धरणातून पाणी सोडण्यामागे एक अत्यंत शास्त्रीय, नियोजनबद्ध आणि टप्प्याटप्प्याने राबवली जाणारी प्रक्रिया असते…
धरणातील पाणीसाठा, वरच्या भागातील पावसाचा अंदाज, पाणलोट क्षेत्रातून येणारा पाण्याचा वेग, नदीपात्राची क्षमता, धरणाच्या सुरक्षिततेचे निकष आणि खालच्या भागातील नागरिकांची सुरक्षितता… या सर्व बाबींचा अभ्यास करूनच विसर्गाचा निर्णय घेतला जातो.पण हा निर्णय नेमका कोण घेतो? धरणाचे दरवाजे एकाच वेळी का उघडले जात नाहीत? किती पाणी सोडायचे हे कसे ठरते? आणि धरण भरल्यानंतर नेमकी कोणती प्रक्रिया राबवली जाते?
हेही वाचा :लोकसभा-राज्यसभेत वंदे मातरम् विधेयक मंजूर; अपमान केल्यास किती शिक्षा?
धरणाचे दरवाजे एकाच वेळी का उघडले जात नाहीत? ( Dam Water Release )
धरण शंभर टक्के भरलं… आणि लगेच दरवाजे ( Dam Gates ) उघडले… एवढीच या प्रक्रियेची माहिती बहुतेक नागरिकांना असते. मात्र प्रत्यक्षात धरण व्यवस्थापन ही २४ तास सुरू असणारी अत्यंत वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रक्रिया आहे…धरणातील जलपातळी सातत्याने मोजली जाते. त्याचबरोबर हवामान खात्याकडून पुढील २४, ४८ आणि ७२ तासांचा पावसाचा अंदाज घेतला जातो. पाणलोट क्षेत्रात किती पाऊस झाला आणि अजून किती पाणी धरणात येऊ शकते, याचा अंदाज अभियंते बांधतात…. फक्त धरण भरलं म्हणून पाणी सोडलं जात नाही. धरणाच्या सुरक्षित जलपातळीपेक्षा पाणी वाढण्याची शक्यता, येणाऱ्या पाण्याचा वेग आणि धरणावर निर्माण होणारा दाब या सर्व बाबींचा अभ्यास केला जातो.
धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय कोण घेतं?
धरणतून विसर्गाचा निर्णय हा एकट्या अधिकाऱ्याचा नसतो.जलसंपदा विभागाचे अभियंते, धरण नियंत्रण कक्ष, वरिष्ठ अधिकारी, काही ठिकाणी विभागीय नियंत्रण यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन यांच्यात समन्वय साधला जातो.धरणात येणाऱ्या आणि बाहेर सोडल्या जाणाऱ्या पाण्याचे गणित सतत तपासले जाते. जर धरणात येणारे पाणी बाहेर सोडल्या जाणाऱ्या पाण्यापेक्षा जास्त असेल, तर टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवला जातो.
दरवाजे कसे उघडतात? तेही पाहूयात… धरणाचे सर्व दरवाजे एकाच वेळी पूर्णपणे उघडले जात नाहीत.सुरुवातीला एखादा किंवा दोन दरवाजे काही सेंटीमीटर किंवा काही फूट उघडून नदीतील पाण्याची प्रतिक्रिया पाहिली जाते.नदीपात्राची क्षमता, पूल, बंधारे, गावांची परिस्थिती आणि पाण्याची पातळी यावर सतत लक्ष ठेवले जाते.गरज भासल्यास विसर्ग हळूहळू वाढवला जातो किंवा कमीही केला जातो.
विसर्ग वाढवण्यापूर्वी कोणती प्रक्रिया राबवली जाते? ( Dam Water Release )
धरणातून मोठा विसर्ग करण्यापूर्वी जिल्हा प्रशासन, महसूल विभाग, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि ग्रामपंचायतींना सूचना दिल्या जातात. सायरन वाजवले जातात. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे संदेश दिले जातात. सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप, स्थानिक प्रशासन, लाऊडस्पीकर आणि प्रसारमाध्यमांद्वारे नागरिकांना नदीपात्रापासून दूर राहण्याचे आवाहन केले जाते.
धरणातून सोडले जाणारे पाणी म्हणजे पूर आणण्यासाठी नसते, तर धरण सुरक्षित ठेवण्यासाठी आणि अतिरिक्त पाण्याचे नियंत्रित व्यवस्थापन करण्यासाठी असते.योग्य वेळी नियंत्रित विसर्ग झाला नाही, तर धरणावर अतिरिक्त ताण निर्माण होऊ शकतो. त्यामुळे धरणाची सुरक्षितता आणि खालच्या भागातील नागरिकांची सुरक्षितता या दोन्हींचा समतोल राखत प्रत्येक निर्णय घेतला जातो.









