NEET Re Exam Entry Denied: अवघ्या काही मिनिटाच्या उशिरामुळे नीट री-एक्झामला बसण्याची संधी देशातील अनेक विद्यार्थ्यांनी गमावली आहे. वेळेच्या कडक नियमांमुळे परीक्षा केंद्राबाहेरच त्यांचा हिरमोड झाला.
देशभरात कडक सुरक्षा व्यवस्थेत रविवारी NEET-UG ची पुर्नपरीक्षा पार पडत असताना अनेक विद्यार्थ्यांना वेळेवर परीक्षा केंद्रात पोहोचता न आल्याने मोठा फटका बसला. दुपारी १.३० वाजता प्रवेशद्वार बंद करण्याच्या नियमामुळे मुंबई, बंगळुरू आणि भोपळ येथे काही विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची संधीच मिळाली नाही. वाहतूक कोंडीमुळे उशीर झाल्याचा आरोप अनेक पालकांनी केला आहे.
पेपरफुटी आणि इतर अनियमिततेच्या आरोपींनंतर राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) यापूर्वीची परीक्षा रद्द केली होती. त्यानंतर ही पुनर्परीक्षा आयोजित करण्यात आली. देशातील ५५१ शहरांमधील ५४४० परीक्षा केंद्रावर आणि परदेशातील १४ केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. यंदा परीक्षेसाठी अतिरिक्त १५ मिनिटांचा वेळही देण्यात आला आहे.
हेही वाचा: NEET 2026 Re-Exam: आज 22 लाख विद्यार्थी पुन्हा देणार परीक्षा; Air Forceने सुरक्षित पोहोचवले पेपर
वृत्तसंस्था ANI च्या माहितीनुसार, बंगळुरूमधील एका परीक्षा केंद्रावर चार विद्यार्थिनी निर्धारित वेळेपेक्षा काही क्षण उशिरा पोहोचल्याने त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. पालकांनी काँग्रेसच्या रॅलीमुळे वाहतूक कोंडी झाल्याचा आरोप केला. विद्यार्थिनी परीक्षा केंद्राबाहेर रडत प्रवेशासाठी विनंती करत असल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
महर्षी दयानंद महाविद्यालय
मुंबईतील परळ परिसरातील महर्षी दयानंद महाविद्यालयातही अशीच घटना घडली. दोन विद्यार्थी १-२ मिनिटे उशीर झाल्याने परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला. यामुळे केंद्राबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांच्या पालकांनी वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पोलिस बंदोबस्तामुळे उशीर झाल्याचा आरोप केला.
मध्य प्रदेशातील भोपाळ
मध्य प्रदेशातील भोपाळमध्येही अशाच प्रकारे दोन विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यापैकी एका विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी परीक्षा केंद्राकडे जाताना अचानक अपघात झाल्याने उशीर झाल्याचा दावा केला. मात्र, नियमांमध्ये कोणतीही शिथिलता नसल्याने त्यांनाही परीक्षा देता आली नाही.
राष्ट्रीय परीक्षा एजन्सी
दरम्यान, राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) यंदाच्या परीक्षेसाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था लागू केली होती. देशभरातील हजारो परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही, जॅमर आणि विशेष देखरेखीची व्यवस्था करण्यात आली होती. पेपरफुटी आणि गैरप्रकारांच्या आरोपांनंतर पुनर्परीक्षा घेतली जात असल्याने यंदा सुरक्षा व्यवस्थेला विशेष प्राधान्य देण्यात आले.
महत्वाची बातमी
परीक्षा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, सर्व उमेदवारांसाठी समान नियम लागू असून वेळेच्या अटींचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. मात्र, काही मिनिटांच्या उशिरामुळे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांच्या भावना आणि त्यांच्या भवितव्याबाबतचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.









