Parth Pawar: पुण्यात काल (29 जुलै 2026) पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा शाही साखरपुडा पार पडला. पाहा या सोहळ्यातील खास फोटो.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे खासदार पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा साखरपुडा गुरुवारी पुण्यातील येरवडा परिसरातील द रिट्झ-कार्लटन हॉटेलमध्ये उत्साहात पार पडला. या खास सोहळ्याला राज्यातील तसेच देशातील अनेक राजकीय नेते, कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते.


कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि प्रतिभा पवार यांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले. याशिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, निलेश लंके, मंत्री धनंजय मुंडे, आदिती तटकरे, दत्ता भरणे यांच्यासह विविध पक्षांतील अनेक नेत्यांनी या समारंभाला हजेरी लावली.
हेही वाचा: तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय! महाराष्ट्रातील शाळांच्या जेवणाची तपासणी,किती परवाने रद्द होणार?


अजितदादा पवार यांच्या आठवणींनी सर्वजण भावुक
पार्थ पवार यांच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या क्षणी दिवंगत वडील अजितदादा पवार यांच्या आठवणींनी वातावरण भावूक झाले. साखरपुड्यावेळी पार्थ आणि कायनात दोघांच्याही भावना अनावर झाल्याचे उपस्थितांनी अनुभवले.
माहितीनुसार, या समारंभाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांसह विविध पक्षांतील अनेक खासदार उपस्थित होते. संपूर्ण पवार कुटुंबाने या आनंदाच्या क्षणात सहभाग घेतला.
कायनात दारा यांची शैक्षणिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमी
कायनात दारा या पंजाबी हिंदू कुटुंबातील असून त्यांचे शालेय शिक्षण नवी दिल्लीतील द ब्रिटिश स्कूल, चाणक्यपुरी येथे झाले आहे. त्यानंतर त्यांनी लंडनमधील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स (LSE) मधून आंतरराष्ट्रीय संबंध (International Relations) विषयात प्रथम श्रेणीत पदवी संपादन केली.
करिअरच्या सुरुवातीला त्यांनी NDTV 24×7 मध्ये रिपोर्टर आणि आउटपुट एडिटर म्हणून काम केले. सध्या त्या आपल्या कुटुंबाच्या हॉस्पिटॅलिटी आणि रिअल इस्टेट व्यवसायात सक्रिय भूमिका पार पाडत आहेत.
विवाहाची तारीख निश्चित
पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा विवाह 27 फेब्रुवारी 2027 रोजी बारामती येथे पार पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
विवाहासंदर्भातील धार्मिक चर्चेला पूर्णविराम
विवाहाच्या वेळेबाबत समाजात विविध चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी करवीर पीठाच्या शंकराचार्यांची भेट घेऊन धर्मशास्त्रीय मार्गदर्शन घेतले. या भेटीत विवाहाची तारीख आणि त्यासंबंधीच्या परंपरांवर चर्चा झाली.
शंकराचार्यांनी स्पष्ट केले की, कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या निधनानंतर आवश्यक धार्मिक विधी पूर्ण करणे महत्त्वाचे असते. मात्र, एका वर्षाच्या आतच विवाह करणे धर्मशास्त्रानुसार बंधनकारक नाही. त्यामुळे यासंदर्भात समाजात असलेले गैरसमज दूर करण्याचे आवाहनही करण्यात आले.









