• Home
  • राजकारण
  • राजकीय पट! राज्याच्या राजकारणातल्या सध्या ‘या’ आहेत महत्त्वाच्या ३ घडामोडी
Top News

राजकीय पट! राज्याच्या राजकारणातल्या सध्या ‘या’ आहेत महत्त्वाच्या ३ घडामोडी

Uddhav Thackery Ajit pawar devendra Fadnavis
108

3 Major political developments in the state : सध्या राज्याच्या राजकारणातील घडामोडींना अधिक वेग आला आहे. त्यातील महत्त्वाच्या ३ घडामोडींचा आढावा घेऊ.. विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेतेपद अद्याप रिक्त असल्याचा मुद्दा उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी थेट उपमुख्यमंत्रीपद रद्द करण्याची मागणी केली आहे. नाशिकमधील तपोवनात साधुग्राम वसविण्यासाठी प्रस्तावित वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून उफाळलेल्या वादात भाजपा एकाकी पडल्याचे दिसून आले आहे. तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोल्हापूरमध्ये शिवसेनेची कायमच फसवणूक झालेली असल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे, या महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेऊ..

उपमुख्यमंत्रिपद रद्द करण्याची ठाकरेंची मागणी

विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेतेपद अद्याप रिक्त असल्याचा मुद्दा उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी थेट उपमुख्यमंत्रीपद रद्द करण्याची मागणी केली. एकतर विरोधी पक्षनेतेपद द्या, अन्यथा उपमुख्यमंत्रिपद तातडीने रद्द करा’, असे ठाकरे यांनी म्हटले आहे. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. महायुतीमधील तिन्ही पक्षाचे चिन्ह, नाव, वेगवेगळे असले तरी त्यांचा मालक एकच आहे. भाजपाच्या शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष या भाजपाच्या बी टीम असल्याचा आरोपही ठाकरे यांनी केला. खरे तर विरोधी पक्षनेतेपद महायुती सरकारने आतापर्यंत द्यायलाच पाहिजे होते. आता एक वर्ष होऊन गेले तरी एका वर्षांत सरकारने काहीही केलेले नाही. दोन्ही सभागृहांना विरोधी पक्ष नेते नाहीत. मग हे सरकार विरोधी पक्ष नेत्याला एवढे का घाबरतेय? आता तरी सरकारने तात्काळ विरोधी पक्षनेते पद जाहीर केले पाहिजे. जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवत असाल तर मग तुम्हीदेखील उपमुख्यमंत्रिपद रद्द केले पाहिजे. कारण संविधानामध्ये उपमुख्यमंत्रिपदाबाबत कुठेही तरतूद नाही” असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – हितेंद्र ठाकूर यांचा बालेकिल्ला फुटला, माजी नगराध्यक्षाचा शिंदे गटात प्रवेश

वृक्षतोडीच्या वादात भाजपा एकाकी?

नाशिकमधील तपोवनात साधुग्राम वसविण्यासाठी प्रस्तावित वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून उफाळलेल्या वादात भारतीय जनता पक्ष एकाकी पडल्याचे दिसून येत आहे. अजित पवार गटानंतर आता शिवसेना शिंदे गटही तपोवन वाचवा मोहिमेत उतरला आहे. कुंभमेळा नियोजनासाठी स्थापन केलेल्या कुंभमेळामंत्री उपसमितीत गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखालील समितीत राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ आणि अॅड. माणिकराव कोकाटे सदस्य आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडून दादा भुसे आणि उदय सामंत यांना सदस्यपद देण्यात आले आहे. त्याशिवाय भाजपाचे जयकुमार रावल आणि शिवेंद्रसिंह भोसले हेदेखील या समितीचे सदस्य आहेत. समिती स्थापन झाल्यापासून आतापर्यंत एकच बैठक झाली आहे. कुंभमेळामंत्री उपसमितीत मोठ्या प्रमाणात वृक्ष तोडावे लागतील, यावर चर्चाच झाली नसल्याचे शिवसेना शिंदे गटाने उघड केल्याने भाजपा अडचणीत आला आहे. त्यातच शिंदे सेनेच्या स्थानिक नेत्यांनी वृक्षतोडीविरोधात आंदोलन केल्याने भाजपाची कोंडी झाली आहे.

राष्ट्रवादीकडून शिंदे गटाची फसवणूक ?

कोल्हापूरमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिवसेनेची (शिंदे) कायमच फसवणूक झालेली असल्याचा आरोप शिंदे गटाचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम यांनी शनिवारी केला. कोल्हापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची अशीच भूमिका राहणार असेल तर ते महायुती धर्म म्हणून योग्य ठरणार नाही, असेही ते म्हणाले. कदम यांच्या या आरोपांमुळे शिंदे गट आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षातील मतभेद समोर आले आहे. सत्यजित कदम यांनी यापूर्वी २०१४ साली काँग्रेसकडून कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर पुढील पोटनिवडणूक त्यांनी भाजपाच्या तिकीटावर लढवली. अलीकडेच त्यांनी भाजपाचे कमळ सोडून शिंदे गटाचा धनुष्यबाण हाती घेतला आहे. कोल्हापूर महापालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचा किल्ला लढवण्याची तयारी कदम यांनी सुरू केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts