Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • “काही जण माझ्या नावाने बोंबाबोम करत होते;” नवाब मलिकांचा भाजपवर हल्लाबोल
Top News

“काही जण माझ्या नावाने बोंबाबोम करत होते;” नवाब मलिकांचा भाजपवर हल्लाबोल

Nawab Malik BJP Attack

Nawab Malik attack on BJP : सध्या राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मुंबई महापालिकेसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती झाली आहे. मात्र, महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटानं ही निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्या नावाला विरोध करण्यात आला होता. जर मलिक असतील तर युती होणार नाही असं भाजपच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं होतं, त्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटानं मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर आज मुंबईमध्ये नवाब मलिक यांची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

हेही वाचा –  ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग

काही जण माझ्या नावाने बोंबाबोम करत होते – नवाब मलिक

नवाब मलिक यांनी या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. काही जण माझ्या नावाने बोंबाबोम करत होते. मी असेल तर युती होणार नाही, असं काही जणांनी म्हटलं होतं. पण अजित पवार हे माझ्या पाठीशी उभे राहिले. अजित पवार यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला, हा निर्णय योग्य आहे, असं यावेळी नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. मलिक यांनी पक्षीय संघटनात्मक व राजकीय स्थितीबाबत विविध मुद्दे मांडले.

 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे ९४ जागांसाठी उमेदवार जाहीर

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे ९४ जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले असून, त्या सर्व उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले आहेत. आम्ही दिलेल्या उमेदवारांमध्ये महिलांची संख्या मोठी आहे. यामध्ये उच्चशिक्षित महिला, भाजीपाला विक्रेते, सफाई कर्मचारी यांचा समावेश असून, समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका पक्षाने घेतली आहे. भूमिपुत्रांसोबतच मुंबईला आपली कर्मभूमी मानणाऱ्यांनाही आम्ही संधी दिली, असं मलिक म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उत्तर भारतीयांना सर्वाधिक तिकिटे दिली – नवाब मलिक

पक्षातर्फे सर्व जाती-धर्मांतील लोकांचा समावेश करून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उत्तर भारतीयांना सर्वाधिक तिकिटे दिली आहेत. ही तिकीट कोणत्याही एका विशिष्ट वर्गाला न देता, उत्तर भारत व दक्षिण भारतातील सर्व जाती-धर्मांतील लोकांना देण्यात आली आहेत. त्यामुळे मी ठामपणे सांगतो की, यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी ताकद दिसून येईल, असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts