• Home
  • शैक्षणिक बातम्या
  • “भारत कधीही झुकणार नाही…”; पहलगाम हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचा दहशतवादाविरोधात घणाघात
Top News

“भारत कधीही झुकणार नाही…”; पहलगाम हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचा दहशतवादाविरोधात घणाघात

pm modi 7

PM Narendra Modi | पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या (Pahalgam Terror Attack) पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शहीद नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. जवानांना श्रद्धांजली वाहत पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर एक भावनिक संदेश दिला आहे. तसेच भारत दहशतवादापुढे कधीही झुकणार नाही, असं मोठं वक्तव्यही पंतप्रधान मोदींनी केलं आहे.

हेही वाचा – ‘महिला सक्षमीकरण करण्याचा काँग्रेसचा कधीच हेतू नव्हता…’, मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल

पंतप्रधान मोदींचा दहशतवाद्यांना गंभीर इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं आहे की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांना कधीही विसरले जाणार नाही. तसेच पंतप्रधान मोदींनी दहशतवादाबाबत एक स्पष्ट संदेश देखील दिला. भारत दहशतवादापुढे झुकणार नाही आणि दहशतवाद्यांच्या योजना कधीही यशस्वी होणार नाहीत, असं त्यांनी म्हटलं आहे.

गेल्या वर्षी याच दिवशी पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या निष्पाप जीवांचे स्मरण. त्यांना कधीही विसरले जाणार नाही. या कधीही भरून न येणाऱ्या नुकसानीमुळे दुःखी असलेल्या शोकाकुल कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. एक राष्ट्र म्हणून, आपण दुःखात आणि दृढनिश्चयात एकजूट आहोत. भारत कोणत्याही स्वरूपातील दहशतवादापुढे कधीही झुकणार नाही आणि दहशतवाद्यांचे कुटिल मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत, असा इशारा पंतप्रधान मोदींनी दिला आहे.

भारतीय लष्करानेही दहशतवादी आणि त्यांच्या आश्रयदात्यांना एक खुला संदेश दिला आहे. भारतीय लष्कराने ‘एक्स’ (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, जर दहशतवाद्यांनी भारताविरुद्ध अशी घृणास्पद पाऊले उचलली, तर त्यांना निश्चितपणे आम्ही प्रत्युत्तर देऊ. तसेच आत्तापर्यंत भारताविरुद्ध केलेल्या कृत्यांना निश्चितपणे प्रत्युत्तर दिले जाईल. न्याय नक्कीच मिळेल, असं भारतीय लष्करानं म्हटलं आहे.

या संदेशासोबतच भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन महादेव’ दर्शवणारे एक ग्राफिक शेअर केले आहे ज्यामध्ये पहलगामच्या मारेकऱ्यांना कसे नरकात पाठवण्यात आले याचा तपशील आहे. पहलगामवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना निष्प्रभ करण्यासाठी ‘ऑपरेशन महादेव’ हे लष्कराचे अभियान होते.

दरम्यान, गेल्या वर्षी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे एक मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. दहशतवाद्यांनी बैसरन खोऱ्यात पर्यटकांना लक्ष्य केलं होतं. लोकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या होत्या. या हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांनी आपले प्राण गमावले आणि अनेक जण गंभीर जखमी झाले होते. तर या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. या हल्ल्यानंतर, भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू करून पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts