एक मेसेज… त्यातून वाद… आणि त्यानंतर थेट अपहरण आणि खून!
Pune kidnapping murder : एका साध्या मेसेजवरून सुरू झालेला वाद इतका टोकाला गेला, की एका तरुणाला पुण्यातून बाहेर बोलावून त्याचे अपहरण करण्यात आले आणि सांगलीत नेऊन त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे पुणे आणि सांगली परिसरात खळबळ उडाली आहे. गोविंद उपासे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. नात्यातील एका महिलेच्या मोबाईलवर मेसेज केल्याचा राग आरोपींच्या मनात होता, अशी प्राथमिक माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी महिलेसह तिघांना अटक केली आहे.
९ ऑगस्टच्या रात्री गोविंद उपासे हे धायरी परिसरात मित्रांसोबत जेवायला गेले होते. रात्री घरी परतल्यानंतर मध्यरात्री दोनच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर आरोपींचा संपर्क झाला. ‘मित्रांसोबत जाऊन येतो’ असे सांगून ते दुचाकी घेऊन घराबाहेर पडले. मात्र, त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत.
हेही वाचा : सिब्बल म्हणतात नार्वेकरांचा निर्णय चुकीचा; नार्वेकरांचा पलटवार, ‘आरोप बिनबुडाचे’
पुण्यातून अपहरण, सांगलीत गोविंद उपासे यांचा खून ( Pune kidnapping murder )
११ ऑगस्टला मुलगा जयवंत याने वडील बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. दरम्यान, १२ ऑगस्टला सांगलीतील शामरावनगर परिसरात भांडणाची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, पुण्यातून गोविंद यांचे अपहरण केल्याची माहिती समोर आली.
पोलिसांच्या तपासात गोविंद यांना मारहाण करून त्यांचा मृतदेह कडेगावमधील कालव्यात टाकल्याचे समोर आले. घटनास्थळाकडे आरोपी कारने जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले आहे.
या प्रकरणात संबंधित महिलेवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.









