Iran War : आखाती देशात जरी युद्ध पेटलं असलं तरी त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं यात मरण होतंय. कारण आताच्या घडीला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात फळं आणि भाज्यांची निर्यात होत असते. त्या निर्यातीवर परिणाम झाल्यानं शेतकरी संकटात सापडलाय. द्राक्षे आणि कांदा यासह केळी, पपई, आंबा, संत्री, पेरु, बोरं, काकडी, टरबुज, खरबूज अशा अनेक फळांची निर्यात या दिवसांत आखाती देशांत मोठ्या प्रमाणात वाढलेली असते. मात्र आता युद्धानं हे सगळं ठप्प केल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान होतंय. युद्ध कधी संपेल हे माहीत नाही, त्यातील जास्तीत शेतकऱ्यांकडे कोल्ड स्टोरेजची सुविधाही नाही. आधी पिकासाठी लागणारा खर्च आणि आता कोल्ड स्टोरेजसाठी लागणारा खर्च त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात काही उरत नाही. त्यामुळे हे इराणचं युद्ध महाराष्ट्रातील शेतकऱ्याचं मरण ठरतंय.
हेही वाचा – अमेरिकेचा महाप्रहार! इराणच्या युद्धनौका उद्ध्वस्त, हजारो तळांवर बॉम्बवर्षाव
आखाती देशातील युद्धामुळे सांगली जिल्ह्यातून द्राक्षनिर्यात ठप्प झाली आहे. यामुळे द्राक्षांनी कोल्ड स्टोरेज फुल झाली असल्याचे चित्र दिसून येतंय. या युद्धजन्य परिस्थितीमध्ये जर द्राक्ष निर्यात करायची असेल अधिकचा कर द्यावा लागेल असं सांगण्यात येत असल्याचे द्राक्ष निर्यातदार सांगत आहेत. यामुळे द्राक्ष बागायतरांच्या बरोबर द्राक्ष निर्यातदार देखील मोठ्या संकटात सापडला आहे. कोल्ड स्टोरेजमध्ये द्राक्ष वाढू लागल्याने पर्यायाने कंटेनर कुलिंगचा खर्च वाढणार आहे आणि तो या व्यापाऱ्यांनाच सोसावा लागणार आहे.
इराण – अमेरिका युद्धाचा कांद्याला फटका
कांदा उत्पादकाचं माहेर घर म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख असून गेल्या काही दिवसापासून कांद्याला कवडीमोड भाव मिळतोय. त्यातच आता इराण – अमेरिका युद्धाचा फटका कांद्याला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतातून मोठ्या प्रमाणावर आखाती देशात कांदा निर्यात होतो. त्यातच आता रब्बी म्हणजे उन्हाळी कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर येणार आहे. अशा परिस्थितीत पूर्वीचाच कांदा निर्यात न झाल्याने कांद्याचे भाव गडगडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीच सततच्या कांद्याच्या भावात होणाऱ्या घसरणीमुळे कांदा उत्पादक अडचणीत आला आहे. आता युद्धाचाही फटका बसणार असल्याने शेतकऱ्यांसह कांदा निर्यातदारांची चिंता वाढणार आहे.
जेएनपीटी बंदरावर 10 हजार कंटेनर अडकून पडले
जेएनपीटी बंदरावर कांदा, फळे, भाजीपाला आणि इतर वस्तूंचे साधारण 10 हजार कंटेनर अडकून पडले आहेत. आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतराष्ट्रीय बाजारपेठ बंद असून शिपिंग कंपन्यांनी देखिल सागरी वाहतूक थांबवली आहे. अडकजण पाडलेल्या कंटेनर मधील बहुतांश माल हा नाशवंत असल्याने पुढील 2-4 दिवसांत परिस्थिती नियंत्रणात न आल्यास माल खराब होण्याची शक्यता असून यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची परिस्थिती उद्भवू शकते.






