Solapur: सोलापूरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वाद आणि आर्थिक कारणांवरून एका विवाहित महिलेचा छळ झाल्याची आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी संबंधित आरोपीला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला नर्गिस शेख हिचा विवाह काही महिन्यांपूर्वी झाला होता. सुरुवातीला सर्व काही सुरळीत असले तरी नंतर घरगुती वाद आणि आर्थिक मागण्यांवरून तिच्यावर मानसिक व शारीरिक छळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या त्रासाला कंटाळून ती काही काळासाठी माहेरीही गेली होती.
हेही वाचा: पदवीधरांसाठी नोकरीची मोठी संधी! ITBP मध्ये इंजिनिअर पदांसाठी भरती जाहीर; जाणून घ्या वेतन किती मिळेल
ही घटना १५ एप्रिल रोजी रात्री दहाच्या सुमारे घडली. या दिवशी पती तिच्या माहेरी पोहोचल्याचे सांगितले जाते. दोघांमध्ये खासगी बोलणे होईल असे सांगून तो तिला एका खोलीत घेऊन गेला. त्यानंतर घडलेल्या घटनेत ती गंभीररीत्या भाजली गेली. कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र गेली ६ दिवस उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणात सुरुवातीला छळ आणि जीवघेण्या हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र महिलेच्या मृत्यूनंतर तो गुन्हा हत्येच्या कलमांमध्ये रूपांतरित करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.











