Virar Crime: विरार पूर्वेतील शिरगाव परिसरात मंगळवारी १२ मे रोजी दुपारी घडलेल्या एक धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. माहिती अधिकारी कार्यकर्ते आत्माराम पाटील यांची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली असून या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आत्माराम पाटील हे शिरगावमधील खदानी परिसरात काही अधिकाऱ्यांसोबत गेले होते. त्यावेळी अचानक झालेल्या वादातून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दगडाने मारहाण केल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
हेही वाचा: आनंदाची बातमी! आता ‘या’ शिक्षकांना TET मधून मिळणार सूट; मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल काय?
या घटनेदरम्यान महसूल विभागातील एक अधिकारीही घटनास्थळी उपस्थित होते. हल्ल्याच्या गोंधळात त्यांनाही किरकोळ दुखापत झाली असून संबंधित वाहनांचेही नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
प्राथमिक तपासात खदानीशी संबंधित वादातून हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही संशयितांची नावेही तपासात समोर आली असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच विरार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास वेगाने सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, भरदिवसा घडलेल्या या हत्याकांडामुळे RTI कार्यकर्त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. स्थानिक नागरिकांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.












