Hair Care Tips | आपल्या केसांना चमकदार, मऊ आणि निरोगी ठेवण्यासाठी अनेकजण शॅम्पूनंतर लगेच तेल लावतात. काहींना वाटतं की यामुळे केसांना अधिक पोषण मिळतं, पण प्रत्यक्षात ही सवय केसांसाठी हानिकारक ठरू शकते. शॅम्पूनंतर लगेच तेल लावल्याने केस चिकट होणे, धूळ साचणे आणि टाळूशी संबंधित समस्या वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे केसांची योग्य काळजी कशी घ्यावी आणि तेल लावण्याची योग्य वेळ कोणती? याबाबत आता आपण जाणून घेऊया.
टाळूवर साचू शकते घाण – शॅम्पूने केस धुतल्यानंतर फक्त आपले केसच नाही, तर टाळू देखील स्वच्छ होतो. पण बरेच लोक शॅम्पूने केस धुतल्यानंतर लगेच टाळूला तेला लावतात. शॅम्पू लावल्यानंतर लगेच टाळूला तेल लावल्याने तेलाच्या थराखाली ओलावा जमा होऊ शकतो, यामुळे टाळूचे संतुलन बिघडते आणि जिवाणूंची वाढ होते. त्यामुळे डोक्यात खाज सुटणे, जळजळ होणे किंवा कोंडा होणे अशा समस्या निर्माण होतात.
केस चिकट होतात – केस धुतल्यानंतर लगेच केसांना तेल लावल्याने केस चिकट दिसतात. याचं मुख्य कारण म्हणजे केसांना सुकण्यासाठी पुरेसा वेळ मिळालेला नसतो. ज्यावेळी केस ओले असतात तेव्हा तेल केसांच्या पृष्ठभागावर जमा होते आणि शॅम्पू, कंडिशनरच्या उरलेल्या अवशेषांसोबत मिसळून एक तेलकट थर तयार होतो. यामुळे केस चमकदार दिसण्याऐवजी चिकट दिसू शकतात.
तेल शोषून घेत नाही – जेव्हा तुम्ही केस धुता तेव्हा लगेच तेल लावले तर अतिरिक्त पाणी तुमच्या केसांसाठी एक अडथळा निर्माण करते. तेल पाण्याच्या पृष्ठभागावरच राहते आणि टाळूमध्ये खोलवर शिरू शकत नाही. त्यामुळे तुमच्या केसांना पूर्ण पोषण मिळत नाही आणि ते चिकट वाटू लागतात. त्यामुळे केस ओले असताना तेल लावू नका.
केसांना तेल कधी लावावे?
त्यामुळे केस निरोगी आणि चमकदार ठेवायचे असतील तर तेल लावण्याची योग्य पद्धत आणि वेळ जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. शॅम्पूपूर्वी केसांना तेल लावल्याने केसांना आवश्यक पोषण मिळते आणि ते कोरडे व कमकुवत होण्यापासून बचाव होतो. त्यामुळे पुढच्या वेळी केस धुताना शॅम्पूनंतर नव्हे, तर आधी तेल लावण्याची सवय लावा आणि आपल्या केसांची नैसर्गिक चमक टिकवा.












